अंबरमळा,वसुमळा पाझर तलाव कोरडा
मयूर भुजबळ
तळेगाव ढमढेरे – कासारी (ता. शिरूर) येथील अंबरमळा, वसूमळा पाझर तलावात चासकमानचे आवर्तन येऊनही फक्त दहा टक्के पाणीसाठा सोडण्यात आल्याने तातडीने पाण्याचे आवर्तन सोडून पाझर तलाव भरून घ्यावा. शेतीला व चारा पाण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध करून द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पाणी न सोडल्यास उपोषण करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
शिरूर तहसीलदार, चासकमान प्रकल्प पुणे मुख्य अभियंता, शिरूर चासकमान प्रकल्प उपअभियंता व चासकमान पाटबंधारे विभाग पुणे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे. चासकमान चारी क्र. १२ मध्ये मागील आठवड्यात पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. परंतु कासारी अंबरमळा, वसूमळा पाझर तलावमध्ये पाणी येताच पाण्याचा प्रवाह बंद करून चारी नं. १३ मध्ये सोडण्यात आले आहे. त्यामुळे तलावात १० टक्के सुद्धा पाणीसाठा झाला नसून या भागात तलाव्यातिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने नागरिक, जनावरे तसेच शेती पूर्णपणे तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहे.
विशेष म्हणजे कासारी गाव पाणी पुरवठा योजनेची पाइपलाइन सुद्धा येथून आहे. अशातच तलावात पाणी येताच पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला आहे. प्रशासनाचे कर्मचारी यांना वास्तविक परिस्थिती माहिती असूनही तलाव न भरता पाणी बंद केल्याने भर उन्हाळ्यात नागरिकांना वापरासाठी, जनावरांच्या चाऱ्याासाठी पाण्याची टंचाई भासू लागली आहे. पाणी सोडतेवेळी कर्मचारी नागरिकांशी सवांद साधताना हा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत पाण्याचा प्रवाह बंद होणार नाही, अशी माहिती दिली होती.
परंतु कर्मचारी आत्ता नागरिकांशी बोलायला देखील टाळाटाळ करीत आहेत. फोन घेत नाही किंवा बंद करून ठेवत आहे. तातडीने पाझर तलावात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी. तातडीने पाणी सोडले नाही तर तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. परिणामी याचा परिणाम मनुष्य व जनावरांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे पाझर तलावात पाणी सोडावे अन्यथा सर्व ग्रामस्थ कार्यालयासमोर उपोषण करतील, असा इशारा दिला आहे. संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.