1400 क्युसेसने सोडले पाणी : जुन्नरमध्ये पाणीप्रश्न चिघळणार
नारायणगाव/जुन्नर – कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार शुक्रवारी (दि. 26) कुकडी प्रकल्पातून 30 दिवसांचे दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. येडगाव डाव्या कालव्यातून सुमारे 1400 क्युसेकने हे आवर्तन सुरू झाले आहे. सुमारे 3.8 टीएमसी पाण्याचा विसर्ग होणार आहे. यापैकी पिंपळगाव जोगा (2 टीएमसी), डिंभे (1 टीएमसी), माणिकडोह (500 दलघफु) तर चिल्हेवाडी धरणातून 300 दलघफु पाणी उचलण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली.
दरम्यान हे आवर्तन जून महिन्यापूर्वी सोडू नये, याकरिता तालुक्यातील विविध पक्षांच्या नेत्यांसह शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. मात्र पाणी सोडण्याबाबतचा निर्णय कालवा सल्लागार समितीमध्ये यापूर्वीच झाला होता. त्यामध्ये काही दुरुस्ती करून हे आवर्तन सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यानुसार जुन्नर शहर व परिसरासाठी पाणी राखीव ठेवणे, पिंपळगाव जोगा धरणातून कमी मृतसाठा उचलणे तसेच तालुक्यासाठी आवश्यक पाणी शिल्लक ठेवण्यात येणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.
शेतकरी संघटनेने येडगाव धरणावर ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी आमदार अतुल बेनके, भाजपच्या नेत्या आशा बुचके यांनी प्रत्यक्ष आंदोलनास भेट देऊन आंदोलनकर्त्यांची भावना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना फोनद्वारे कळविली होती. त्यानुसार गुरुवारे (दि. 25) चंद्रकांत पाटील आंदोलनकर्त्यांबरोबर चर्चा करून पाणी सोडण्याचा निर्णय घेणार होते. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजित मीटिंग रद्द झाली असून ती 31 मे रोजी ठेवण्यात आली असल्याचे सांगितले.
जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 27) मीटिंगचे आयोजन केले असून पुढील आंदोलनाचे निवेदन पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत कडुसकर यांना देण्यात येणार आहे, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अंबादास हांडे यांनी नमूद केले.