कोल्हार -राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्दमध्ये गेल्या चार महिन्यांपूर्वी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेली कचरा गाडी धूळ खात पडली असून, गावातील अनेक सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याची ढिगारे पडल्याची बातमी दैनिक प्रभातमधून दि. 4 मे रोजी छापून आली होती. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तत्काळ पावले उचलून गावात कचरागाडी सुरू केली असून, त्यामुळे गावात ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पडलेला कचरा संकलन होण्यासाठी मदत होणार असून, ग्रामस्थांमधून दैनिक प्रभातचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
कोल्हार खुर्द ग्रामपंचायत परिसर, तसेच भोसले नगर, रेणुका नगर, रोहिदास नगर, दत्त नगर परिसरात अनेक ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून कचराकुंड्या बसवण्यात आल्या आहेत. नागरिक या कचरा कुंड्यांमध्ये कचरा टाकत असताना बेजबाबदारपणे फेकतात. त्यामुळे कचराकुंडीच्या आसपास सर्व कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतने गेल्या सहा महिन्यांपूर्वी कचरागाडी खरेदी केली होती. मात्र, काही कारणास्तव ही गाडी एकाच ठिकाणी पडून असल्यामुळे तिच्याच सभोवती कचऱ्याचे ढीग पडले होते.
त्यामुळे गावात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर पडल्याचे वृत्त दैनिक प्रभातमधून छापून आले होते. या वृत्ताची स्थानिक प्रशासनाने दखल घेत तत्काळ पावले उचलली आहे.त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून कचरागाडी सुरू करण्यात आली असून, या गाडीच्या माध्यमातून कचरासंकलन करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे गावात अनेक ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेला कचरा कमी होणार असून, गावातील स्वच्छतेचा प्रश्न यानिमित्ताने मार्गी लागणार असल्यामुळे सर्व ग्रामस्थांमधून दैनिक प्रभातचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.