पिंपरी (प्रतिनिधी) – शिरूर लोकसभेची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडल्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. दोन ते तीन वेळा प्रवेशाच्या चर्चा टळल्यानंतर अखेर अंतिम मुहूर्त ठरला आहे. उद्या मंगळवारी (दि. २६) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्िथतीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीच्या चिन्हावर ते निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश कधी करणार अशी चर्चा होती. अखेर त्या चर्चांना आता पुर्ण विराम मिळणार आहे. मात्र पक्ष प्रवेशादरम्यान उमेदवारीची घोषणा होणार नसल्याची माहिती आढळराव पाटील यांनीच माध्यमांना दिली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये उमेदवारीवरून राजकीय घमासान सुरू असल्याचे पहायला मिळाले होते.
ही जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आली आहे. या मतदारसंघातील आमदारांचा मोठा पाठिंबा पाहून त्यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडल्याची चर्चा आहे. मात्र राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार नसल्याने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच पक्ष प्रवेश देण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढावणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिरुरची जागा राष्ट्रवादीने जिंकली होती.
आता महायुतीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र असल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर परस्पर सहमतीने शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच स्पष्ट झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाची चर्चा रंगली आहे.
गेल्याच आठवड्यात त्यांचा पक्षप्रवेश निश्चित असल्याच्या चर्चा होत्या. मात्र काही कारणांनी तो पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश कधी करणार अशी चर्चा होती. अखेर त्या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे. आढळराव पाटील उद्या 26 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे त्यांचा पक्ष प्रवेशाचा सोहळा होणार आहे. आढळराव पाटील यांच्यासोबत त्यांचे समर्थक देखील राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत.
मात्र या पक्ष प्रवेशावेळी उमेदवारीची घोषणा होणार नसल्याची माहिती आढळरावांनी माध्यमांना दिली आहे. आणखी किती दिवस भिजत घोंगडे पक्ष प्रवेश झाला तरी उमेदवारीची घोषणा होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. एकीकडे शिरुर आणि मावळमध्ये महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर करुन प्रचाराला सुरुवातही केली आहे. दुसरीकडे महायुती मात्र या दोन्ही मतदारसंघात अधिकृतरित्या उमेदवार जाहीर करत नसल्याने उमेदवारीचे घोंगडे अजून किती दिवस भिजत ठेवणार? असा प्रश्न उपस्िथत केला जात आहे.