पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातून वाहणाऱ्या नदींची अवस्था खूपच गंभीर होत आहे. नद्यांची स्िथती बदलण्यासाठी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. हे प्रकल्प अजून कागदावरच आहेत. कागदावरुन प्रकल्प अस्तित्त्वात येण्यापूर्वीच नद्यांचे अस्तित्त्व धोक्यात येत आहे. नदीच्या पात्रामध्ये राडारोडा व मातीचा भराव टाकून पात्र अरुंद करण्याचा प्रकार समोर आला आहे.
काळेवाडी व चिंचवड येथे पवना नदीपात्रामध्ये दिवसाढवळ्या मातीचा भराव टाकला जात आहे. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद होत असून याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातून सुमारे २५ किलोमीटर वाहणारी पवना नदी किवळे, रावेत येथून शहरात प्रवेश करते. शहरा थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड, काळेवाडी, पिंपरी, रहाटणी, पिंपळे सौदागर, कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी व दापोडी या भागांतून जाते.
शहरात वाढणारे नागरीकरण, औद्योगिक क्षेत्रामुळे पवना नदीच्या प्रदूषणात वाढ होत चालली आहे. सातत्याने नदीपात्रात मिसळले जाणारे मैलामिश्रित सांडपाणी आणि औद्योगिक रसायनांच्या पाण्यामुळे नदीची गटारगंगा झाली आहे. असे असताना आता पात्रात भराव टाकून पात्र अरुंद करण्याचे काम सुरू आहे. काळेवाडीतील इम्पायर इस्टेट पुलानजीक पवनानगर, पिंपरीगाव पुलाशेजारी, रहाटणी रस्त्यावर राजरोसपणे सातत्याने हे प्रकार सुरू आहेत.
तसेच बांधकामाचा राडारोडा व मातीची ट्रॅक्टर व डंपरमधून आणून चिंचवडगावातील नदीच्या शेजारील रस्त्यालगत नदीपात्र, तीरावर टाकला जातो. त्यामुळे दिवसेंदिवस नदीचे पात्र अरुंद होत आहे. मात्र, महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पर्यावरण विभाग, राज्य सरकार यांच्या डोळेझाकपणामुळे पवना नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
पुराचा शहराला धोका
नदीपात्रात भराव टाकल्याने पावसाळ्यात अरुंद पात्रातून पाणी बाहेर येऊन महापूर येतो. पवना धरणक्षेत्रात अधिक पाऊस पडल्यास शहराच्या अनेक भागांमध्ये नदीचे पाणी शिरते. अनेकदा मोठे पूरही आले आहेत. अशी स्िथती असतानाही भराव टाकून पूरासाठी अनुकूल परिस्िथती निर्माण केली जात आहे.
कारवाईचा फक्त फार्स
नदी तीरावर अनेकांनी पूररेषेत अतिक्रमण केले आहे. पात्रात राडारोडा टाकून नदीपात्र बुजविले आहे. यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडून त्यांना पाठीशी घातले जात आहे. कारवाईचा फक्त फार्स असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस नदीपात्र अरुंद होत आहे.
नदीपात्रामध्ये राडारोडा टाकणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यासाठी पथकांची नेमणूक केली असून त्यामध्ये चार जवानांच्या समावेश आहे. नदीपात्रात भराव टाकत असल्याचे आढळून आल्यावर जागा मालक, गाडी मालक, चालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतात. याबाबत सारथी किंवा १८००१२०३३२१२६ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येते. – संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग.