अक्षय्यतृतीया हा सण भारतीय संस्कृतीमधील कृषी संस्कृतीशी नाते जोडणारा आहे. भारतात आपल्या बळीराजाच्या हिताचा व कल्याणाचा विचार करून सण व उत्सव साजरे केले जातात.
अक्षय्यतृतीयेच्या इतिहासात डोकावले असता अनेक आख्यायिकांचे गुंफण त्याभोवती झाले आहे. मातीत आळी घालणे व पेरणी या प्रक्रियेस या दिवशी प्रारंभ होतो. अक्षय्यतृतीयेनंतर पावसाळा येणार असतो. गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्यतृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. थोडक्यात काय तर मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खतमिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे होय. बळीराजा आपल्या काळ्या आईची सेवा करताना ही मशागत मोठ्या निष्ठेने करीत असतो.
या दिवशी मशागत केलेल्या जमिनीबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. खासकरून महाराष्ट्रातील कोकण भागात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय्यतृतीयेच्या मुहुर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धारणा आहे. अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्यतृतीयेच्या मुहुर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे. वनऔषधीच्या आधारे आयुर्वेदीय वनस्पतीची लागवड करून नव्या जगावर भारतीय आरोग्य पद्धतीचा प्रभाव टाकण्याचा आपण पुनश्च: संकल्प केला पाहिजे.
अक्षय्यतृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते. अक्षय्यतृतीया या उत्सवाचे पारंपरिक संदर्भ लक्षणीय आहेत. त्यामागे इतिहास, परंपरा व विज्ञान याचा मनोज्ञ संगम घडून आला आहे. या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती साजरी केली जाते. तसेच इतिहासात डोकावून पाहिले असता असे दिसते की, या दिवशी परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंतीही विशेषत्वाने साजरी केली जात असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने कार्य केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.
हा दिवस त्यामुळे ज्ञान परंपरपरेचा सुवर्णयोग मानला जातो. महर्षी व्यासांनी श्री गणेशाच्या साह्याने महाभारतासारखे महान काव्य रचले. त्याप्रमाणे वर्तमान युगातही नव्या ज्ञानरचना या पवित्र दिवसाच्या शुभ मुहुर्तावर केल्या पाहिजेत असा आग्रह धरला जातो तो सार्थ होय. याचा अर्थ असा की, अक्षय्यतृतीयेच्या शुभदिनी भारताने ज्ञानयुगात प्रवेश केला व उभ्या विश्वाच्या इतिहासावर भारतीय ज्ञान परंपरेचा ठसा उमटविला.
भारतामध्ये चारीधाम यात्रेत बद्रिकेश्वर या देवस्थानास विशेष महत्त्व आहे. परंपरा असे सांगते की, या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्यतृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. याचा अर्थ असा की, या पवित्र देवस्थानाचे अक्षय्यतृतीयेस खुले झालेले दरवाजे हे प्रत्यक्ष दीपावलीच्या पाडव्यापर्यंत खुले असतात. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते. मध्ययुगात विषमतेने ग्रासलेल्या भारतीय समाजाला समता व बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या महात्मा बसवेश्वरांचा जन्मसुद्धा अक्षय्यतृतीयेच्या दिवशी झाला. आपल्या परंपरेतील दोषांविरुद्ध बंड करावयाचे आणि मुख्य प्रवाहाशी भक्कम दृढतर नाते ठेवायचे हा आपल्या सुधारणांचा आत्मा होय. दोषांचे निर्दालन आणि प्रगतीचा व परिवर्तनाचा पुनरूच्चार हा आपल्या परंपरेचा मध्यवर्ती धागा होय तो अक्षय्यतृतीयेने जपला आहे.
अक्षय्यतृतीयेच्या शुभ दिनी आणखी काही संदर्भ लक्षात घेण्यासारखे आहे. वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.
अक्षय्यतृतीया हा दिवस ज्ञान पूजनाप्रमाणेच दानाच्या संदर्भातही महत्त्वाचा आहे. महाकाव्य कालीन संदर्भ असे सांगतात की, कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्यतृतीया असे म्हटले आहे. कोणतेही दान हे पवित्र भावनेने केलेले असल्यास त्याचा ऱ्हास होत नाही ते सत्पात्री दान ठरते. त्यागापेक्षा दान श्रेष्ठ मानावे काय? या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे. भगीरथाने अखंड तपश्चर्या केली आणि हिमालयातून गंगा अवतरली. गंगेच्या खोऱ्यात कृषी व फलोत्पादनाची क्रांती झाली आणि आर्यानी पहिला वेद ऋग्वेद लिहिला. ऋग्वेदाचे लेखन म्हणजे कृषी क्रांतीची पहाट होय असे मानले जाते. त्याचासुद्धा सांकेतिक दिवस अक्षय्यतृतीयेशी निगडीत आहे.
अक्षय्यतृतीया हा उत्सव सांस्कृतिक विविधतेचा धागा बळकट करणारा आहे. महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजन करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने आपल्या सहकाऱ्यांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ आणि पन्हे देतात. त्या हळदीकुंकू समारंभांचा अक्षय्यतृतीया हा शेवटचा दिवस असतो. त्याचा अर्थ असा की, सामाजिक जीवनात स्नेहबंध जोपासणे ही बाब महत्त्वाची असून ती परस्पर सहजीवनाचा नवा आदर्श सांगते.
अक्षय्यतृतीया या दिवसाचा भारतीय कालगणनेत विशेष संदर्भ आहे. त्याचे कारण असे की, अक्षय्यतृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. या दिवशी दुसऱ्या युगाला सुरुवात झाली होती. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला “महायुग’ असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला “कल्पादीं’ तसेच त्रेतायुगाचा प्रारंभ म्हणजे “युगादी’चा क्षण होय त्यामुळे दक्षिण भारतात व कर्नाटकात हा सण युगादी म्हणून ओळखला जातो.
प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर