नेवासा – नेवासे ते श्रीरामपुर रस्त्याचे काम सध्या सुरू असून रस्ता रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर 50 ते 60 वर्ष जुनी झाडे तोडण्यात येत आहेत. आवश्यकता नसतांनाही सार्वजनिक बांधकाम व वनविभागाचे अधिकारी संगनमताने ही वृक्षतोड करीत असल्याच्या विरोधात आज विविध सामाजिक संघटनांसह निसर्ग प्रेमींनी तहसील कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन केले.
सुमारे 50 ते 60 वर्ष जुने असलेली मोठ-मोठी चिंच, लिंबाची झाडे रस्ता रुंदीकरण करण्याच्या नावाखाली तोडून टाकण्याचा घाट घातला आहे. रस्ता रुंदीकरणाला देखील कुठलीही अडचण नसतांना साईड पट्ट्यांच्या पलिकडे असणारी झाडे बेकायदेशीर रित्या तोडली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. रस्त्याची शोभा कमी होणार आहे. पशुपक्षांना केवळ झाडांचा आधार असतांना मोठ-मोठ्याला झाडांची कत्तल केली जात आहे. यापूर्वीच आम आदमी पक्षाने चिपको आंदोलन केले होते.
त्यानंतर महिनाभर झाडे तोडण्यात आली नाही. परंतु काल परत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारामार्फत झाडे तोडण्यास सुरुवात केली. त्याला विरोध करण्यासाठी आज तहसील कार्यालयासमोर दीड तास आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निसर्ग प्रेमी कार्यकर्ते व अधिकाऱ्यांनी दि.24 रोजी पाहणी करुन रस्त्यास अडचण नसणाऱ्या झाडांविषयी निर्णय घेण्याचे तसेच वृक्षतोड ताबडतोब बंद करण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना दिले.
यावेळी आम आदमी पक्षाचे ऍड. सादिक शिलेदार, वसुंधरा फाउंडेशनचे महेश मापारी, शिव सहकार सेनेचे बालेंद्र पातेदार, कॉंग्रेसचे रंजन जाधव, रा.स.प.चे संतोष काळे पाटील, पैस फाउंडेशनचे ऍड. संदीप शिंदे, साईनिर्मल फाउंडेशनचे ऍड. सुदाम दुबे, पसायदान फाउंडेशनचे विजयराव तुवर, संदीप आलवणे, सलिमभाई सय्यद, विठ्ठल मैदाड, रामभाऊ केंदळे, भैय्या कावरे, आसिफखान पठाण, जुम्माखान पठाण, विनायक नळकांडे, बंटिभाऊ वाघ यांच्यासह अनेक निसर्ग प्रेमी नागरिक व संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.