नवी दिल्ली – सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली असून आता पुढील महिन्यापासून देशांतर्गत स्पर्धेतील सर्वात मानाची समजली जात असलेली रणजी करंडक स्पर्धाही सुरू करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.
मुश्ताक अली स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या सहा बायोबबल केंद्रांवरच पुढील महिन्यापासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआय गांभीर्याने विचार करीत आहे.
बीसीसीआयच्या कार्यकारी समितीची ऑनलाइन बैठक येत्या रविवारी होणार असून, त्यात या स्पर्धेसह कनिष्ठ गटाच्या तसेच महिलांच्या स्पर्धांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
मुश्ताक अली स्पर्धेसाठीच्या सहा केंद्रांवरच फेब्रुवारीपासून रणजी करंडक स्पर्धेचे आयोजन करण्याची 90 टक्के शक्यता आहे. मुश्ताक अली स्पर्धेचीच गटवारी रणजी स्पर्धेसाठी कायम ठेवण्यात येणार आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेपूर्वी रणजी स्पर्धा खेळवण्यावर बीसीसीआयचा भर आहे. मात्र, रणजी स्पर्धेतील बाद फेरीचे तसेच उपांत्यपूर्व, उपांत्य व अंतिम सामना आयपीएलनंतर खेळवला जाऊ शकतो. यावेळी रणजी स्पर्धेच्या वेळापत्रकात सामन्यांची संख्या कमी केली जाणार आहे.