जिल्ह्यात 705 ग्रामपंचायतींत निवडणूक; 13 हजार 194 उमेदवार रिंगणात
नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील 705 ग्रामपंचायतींच्या 5 हजार 788 जागांसाठी शुक्रवारी(दि.15) मतदान होत आहे. यासाठी तब्बल 12 हजार 765 कर्मचारी काल ईव्हीएम मशिन व अन्य साहित्यासह 2 हजार 553 मतदान केंद्रांवर दाखल झाले असल्याची माहिती महसूल शाखेच्या उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांनी दिली. तसेच एका मतदान केंद्रावर एक मतदान केंद्र अध्यक्ष, तीन कर्मचारी, एक शिपाई, अशा कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार करोनामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्ह्यातील तब्बल 767 ग्रामपंचायतींच्या पंचावर्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात एकूण एक हजार 318 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी 767 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया दि. 23 पासून सुरु झाली. तसेच नामांकन सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाने तांत्रिक असुविधा लक्षात घेत ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची मुभा दिली होती.
अंतिम मुदतीपर्यंत 767 ग्रामपंचायतींसाठी एकूण 23 हजार 801 अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेनंतर 23 हजार 148 उमेदवारी अर्ज वैध ठरले. दरम्यान, 4 जानेवारी रोजी अर्ज माघारीची अंतिम मुदत होती. या मुदतीत जिल्हाभरात एकूण 9 हजार 10 जणांनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या 13 हजार 194 झाली. दरम्यान, 13 हजार 194 उमेदवार मतदारांचा कौल आजमावणार आहेत. शुक्रवारी (दि.15) मतदान प्रक्रिया होणार आहे.
दरम्यान, दर पाच वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक अधिनियमानुसार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची निवडणूक राज्य निवडणूक आयोगामार्फत होत असते. देशात करोना महामारीचे संकट निर्माण झाले. त्यामुळे स्थगित झालेली निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणुकी संदर्भातील प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या संचालनात युद्धदपातळीवर सुरू आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी तहसीलदार यांच्या निर्देशात काल मतदानाचे साहित्य घेवून मतदान केंद्रांकडे रवाना झाले. सोमवारी (दि.18) होणाऱ्या मतमोजणीतून कोणावर गुलाल पडणार, याचा निकाल लागणार आहे.