बंगळूर – भारताची कुणाशीच युद्ध करण्याची इच्छा नाही. मात्र, भारताच्या सन्मानाला धक्का पोहचवल्यास महासत्तेलाही चोख प्रत्युत्तर देण्यास आमचे जवान सक्षम आहेत, अशी परखड भूमिका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरूवारी मांडली.
माजी सैनिक दिनानिमित्त येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राजनाथ बोलत होते. चीनी कुरापतींमुळे आठ महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये सीमेलगत तणावाची स्थिती आहे. त्यापार्श्वभूमीवर, राजनाथ यांनी मांडलेल्या भूमिकेला महत्व आहे.
काही महिन्यांपूर्वी भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. त्यावेळी भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवल्याचे राजनाथ यांनी सूचित केले. आपल्या जवानांच्या शौर्याचा तपशील दिल्यास प्रत्येक भारतीयाला प्रचंड अभिमान वाटेल, असे ते म्हणाले.
भारतीय जवानांनी पाकिस्तानी भूमीत घुसून दहशतवाद्यांवर कारवाई केल्याच्या घटनेकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेऊन शांतता राखण्यावरच भारताचा भर आहे. कारण, ते आमच्या रक्तात आणि संस्कृतीतच आहे. संपूर्ण जगाला आपले कुटूंब मानणारा भारत हा एकमेव देश आहे, असे प्रतिपादनही राजनाथ यांनी केले. त्या कार्यक्रमाला संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत हेही उपस्थित होते.