नांदेड: बाळंतपणासाठी मुलीला माहेरी आणायला गेलेल्या वडिलांच्या दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या अपघातात गर्भवती असणारी लेकीसह तिच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घटना घडली आहे. या दुर्घटनेत वडिलांचाही मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील फुलवळ अंतर्गत असलेल्या सोमासवाडी येथील रहिवासी असलेले बालाजी किशनराव रासवते हे मुलीला बाळांतपणासाठी उदगीरला बाळंतपणासाठी आणण्यासाठी गेले. उदगीरहून परत येताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वर असलेल्या पाटोदा खुर्द नजीक वळणाच्या ठिकाणी दुचाकीचा अपघात होऊन बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सोमासवाडीत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बालाजी रासवते यांची द्वितीय कन्या राजश्रीचा नांदेडच्या तामसा तालुक्यातील राजेश श्रीमंगले येथील युवकाशी गेल्या वर्षी विवाह झाला होता. नोकरीच्या निमित्ताने राजेश श्रीमंगले हे आपल्या पत्नीला म्हणजे राजश्रीला घेऊन उदगीर येथे राहत होते. राजश्री ही सात महिन्याची गरोदर असल्याने आपल्या मुलीला आणण्यासाठी बालाजी रासवते हे सोमवारी उदगीरला गेले. बुधवारी रात्रीच्या वेळी मुलीला परत येत असताना कंधार तालुक्यातील पाटोदा खुर्द राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वळणावरच्या रस्त्या लगतच्या खोल खड्ड्यात कोसळल्याने बाप-लेकीचा आणि पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने बाळ आणि बाळंतिणीचा वाटेतच मृत्यू झाला.
दरम्यान डोक्याला आणि इतर ठिकाणी जबरदस्त मार लागला. रात्रीच्या वेळी वेळेवर मदत न मिळाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान सकाळी पहाटे पाटोदा येथील युवक व्यायाम करण्यासाठी सदर रस्त्यावरून जात असताना रस्त्यालगत खड्ड्यात एक दुचाकी तसेच एक पुरुष व एक महिला असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून त्यांनी जवळ जाऊन अंदाज घेतला असता दोघेही मृत असल्याचे कळताच त्यांनी जळकोट पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.