मुंबई – आदीवासींचे हक्क कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांची तुरूंगात हत्या झाली, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी “रोखठोक’ भूमिका मांडत केंद्र सरकारवर टीकेचे आसूड ओढले. हा 84 वर्षीय वृध्द नरेंद्र मोदी यांचे सरकार ऊलथावून टाकेल इतकी आपली लोकशाही कमकुवत पायावर उभी आहे का? असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारची तुलना हिटलर आणि मुसोलिनी यांच्याशी केली.
एल्गार परिषद प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्वामी यांना अटक केली. न्यायलयीन कोठडीत असताना खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना पाच जुलै रोजी स्वामी यांचे निधन झाले. त्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या “सामना’तील रोखठोक या सदरात राऊत यांनी या सरकारच्या कामगिरीची तुलना इंदिरा गांधी यांच्या जॉर्ज फर्नांडिस यांनी सरकार ऊलथावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांशी केली आहे.
हे सरकार 84 वर्षांच्या वृध्द माणसाला घाबरले. हुकूमशहा सारखे वागले. पण ही भीती हिटलर आणि मुसोलिनीसारखी आहे. एल्गार परिषदेत झालेल्या भडकाऊ भाषणांना पाठींबा देता येणार नाही. त्यानंतर स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला त्याचे काय? त्यात देशाविरोधात युध्द, देशद्रोह आणि देशविघातक कारवायांचा अर्थ काय? आदिवसींना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे म्हणजे देश उलथावून टाकणे आहे का? ही जागृती हा देशद्रोह कसा ठरतो, असा सवाल राउत यांनी केला.
काश्मिरी विलगतावाद्यांपेक्षा माओवादी आणि नक्षलवादी भयानक आहेत, असे मानले तरी 84 वर्षांच्या असहाय्य आणि अपंग बनलेल्या फादरच्या कोठडीतील मृत्यूचे समर्थन करता येत नाही. सरकारला असणारा विरोध आणि देशाला असणारा विरोध यात फरक ओळखायला शिकले पाहिजे. सरकारला केलेला विरोध म्हणजे देशद्रोह असे कोणी म्हणत असेल तर त्यांच्या मनात हुकुमशाहीची बिजे रुजली आहेत, असे यात म्हटले आहे.