अवकाळी पाऊस, हवामान बदलाचा परिणाम ः उत्पादनात घट
रावणगाव- दौंड तालुक्यातील काही भागांत सध्या उसाचे पीक परिपक्व झाले असून, उसाला तुरे येण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे उत्पादनात घट होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहेण रावणगांव, खडकी, मळद अशा दौंड तालुक्यातील विविध गावांमधील ऊस शेतीवर नजर टाकल्यास सर्वत्र उसाचे पीक पूर्ण तयार झाले असून, त्यावर तुरे येत असल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला. परिणामी उसाच्या शेतात पाणी साचून राहिले. सततच्या पावसामुळे पिकास नत्राचे हफ्ते वेळेवर देता आले नाहीत. जास्त पावसामुळे जमिनीतील नत्र पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेले. परिणामी उसाला तुरे आले आहेत. उसाला तुरा येण्यास सुरुवात झाली आहे.
उसाला तुरे येण्याची कारणे
उसाला तुरा येण्यास अनेक घटक कारणीभूत असतात. यामध्ये हवामानात झालेला बदल हे एक प्रमुख कारण आहे. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत उसाला तुरा येतो. दिवसाचे तापमान 26 ते 28 अंश व रात्रीचे तापमान 22 ते 23 अंश असेल आणि हवेतील आर्द्रता 65 ते 90 टक्के, साडेबारा तासांचा दिवस व साडेअकरा तासांची रात्र अशी कारणेही त्यासाठी आहेत. उसाची काही जातींमध्ये तुरा लवकर येतो उदा. को-419, को-7219, को-671, को-94012 या जातीला लवकर तुरा येतो, तर को-740, को-7219 को-86032, कोएम-0265,कोएम-10001,को-92005या जातींना उशिरा तुरा येतो. ज्या जमिनीत पाण्याचा लवकर निचरा होत नाही त्यामध्ये देखील लवकर तुरा येतो. भारी जमिनीत उशिरा, तर हलक्या जमिनीत उसाला लवकर तुरा येतो. मे-जून महिन्यात लागवड केल्यास नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात तुरा येऊ शकतो. मात्र, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये लागवड केल्यास नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात तुरा येत नाही.
तुऱ्यामुळे उसावर होणारा परिणाम
तुरा आलेला ऊस शेतामध्ये दीड ते दोन महिने राहिला तर त्याला पांगशा फुटतात. ऊस पोकळ होण्यास सुरुवात होते. त्यातील साखरेचे विघटन होऊन ग्लुकोज व फ्रुक्टोज या घटकाचे साखरेमध्ये रूपांतर होते. त्यामुळे साखर उताऱ्यात घट होते. याबरोबरच ऊसाच्या उत्पादनात 20 ते 25 टक्के घट होते.