मुंबई: राज्यातील अनेक भागात पाऊस लांबला आहे. त्यामुळे पेरणीबाबत राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्मण झाला . अशा स्थितीत राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीसंदर्भांत महत्वाचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांनी इतक्यात पेरण्या करू नये असे त्यांनी म्हंटले आहे. याबाबतची माहिती त्यांनी एका माध्यमाशी बोलताना दिली आहे.
पेरणीबाबत बोलताना ते म्हणाले, सध्या राज्यातील अनेक भागात जो पाउस पडतोय तो पाऊस हलक्या स्वरूपाचा आहे. या पावसामुळे जमिनीमध्ये अद्याप हवा त्या प्रमाणात ओलावा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन कृषी राज्य मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना केले आहे .
मान्सून रेंगाळला कर्नाटकात
मान्सूनने देशात नियोजित वेळेआधीच एंट्री मारली. मात्र कर्नाटकात दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागातच थांबलेला दिसत आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे. सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण असल्याने गरमीने प्रमाण वाढले आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. काही भागांत पुढील दोन-तीन दिवसांत मान्सूनपूर्व सरींचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात मात्र अद्यापही उष्णतेची लाट जाणवत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांना पावसाची आस
यंदाच्या वर्षी हवामान विभागाने चांगला पाऊस होणार असा अंदाज जरी वर्तवला असला तरी राज्यात मात्र अद्याप पावसासाठी सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनाही वाटच पाहावी लागत आहे. शिवाय राज्यात यावर्षी शेतीसाठी अनुकूल असणारा पूर्वमोसमी पाऊस देखील म्हणावा तसा झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरणच दिसून येत आहे. शेतीची मशागतीची कामे सुरु होऊन बळीराजाला आता पावसाच्या आगमनाची आस आहे.