मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा वादाचा विषय ठरल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. त्यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजाराचा आरोप होत असताना किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. “मला हेच समजत नाहीये की काय चाललंय? औरंगाबादला काय आमदार विकत घ्यायला चाललेत का? ही काय अवस्था झालीये शिवसेनेची? सरकारकडून जनतेचा जो पैसा वसुलीद्वारे आलाय, त्याचा उपयोग स्वत:च्याच आमदारांना विकत घेण्यासाठी माफिया सेना करतेय. इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की स्वत:च्या आमदारांना स्वत:कडे ठेवण्यासाठी वसुलीच्या पैशांचा वापर केला जातोय”, असे किरीट सोमय्या म्हणाले.
“महाराष्ट्रात आम्ही फिरतो तेव्हा लोक आम्हाला प्रश्न विचारतात की स्वत:च्या आमदारांना बिकाऊ म्हणणारा हा मुख्यमंत्री? आमदारांना अँटिचेंबरमध्ये काय सांगत असतील, सौदेबाजी चालू असेल माहिती नाही. हे काय होतंय ठाकरे साहेब?” असा खोचक सवाल देखील किरीट सोमय्यांनी यावेळी केला.