सातारा -प्रधानमंत्री विमा योजनेसह हवामान आधारित फळ पिक विमा योजनेतील जिल्हा बॅंकेच्या सभासद शेतकऱ्यांनी सुधारित बदलातील निकषांची नोंद घ्यावी, असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे दि .22 एप्रिल 2020 रोजीच्या शासननिर्णयानुसार “प्रधानमंत्री फसलबिमा योजना व हवामान आधारित फळ पिक विमा योजना’ खरीप हंगामापासून कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्याबाबतचा मुख्य बदल करण्यात आलेला आहे. बॅंकेशी संलग्न असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सर्व कर्जदार सभासदांनी या योजनेत सहभागी होणे व सहभागी न होणे याकरिता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेत जाऊन केंद्र शासनाने दिलेल्या विहित नमुन्यातील स्वंतत्र घोषणापत्र भरून देणे शासनाने अनिवार्य केलेले आहे. कर्जदार शेतकरी सभासदांनी हे घोषणापत्र भरून दिले नाही तर केंद्र शासनाने त्या सभासदांचा या योजनेत सक्तीने समावेश करावयाचा असल्याबाबत कळविलेले आहे.
“प्रधानमंत्री फसल बिमा योजना व हवामान आधारित फळ पिक विमा योजना’ अनुषंगाने सर्व कर्जदार सभासदांकरिता बॅंक संलग्न विकास सेवा सोसायटी, बॅंक शाखेत घोषणापत्र उपलब्ध करून दिलेले आहे. सर्व कर्जदार सभासदांनी घोषणापत्र त्वरीत भरून देण्याचे आवाहन आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.