सातारा, (प्रतिनिधी) – ‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान’ हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नैसर्गिक शेती उत्पादनांना चांगला भाव मिळत असल्याने, कृषी विभाग नैसर्गिक शेतीविषयी शेतकर्यांना सलग तीन वर्षे मार्गदर्शन करून, त्यांच्या शेतीचे सर्टिफिकेशन करणार आहे. शेतकर्यांनी नैसर्गिक शेती शेतीतील उत्पादनांचे उत्कृष्ट पॅकिंग व ब्रॅण्डिंग केल्यास, त्यास जागतिक बाजारपेठेत चांगला भाव मिळून, आर्थिक उत्पन्न वाढेल. त्यामुळे शेतकर्यांनी नैसर्गिक शेती आणि प्रक्रिया उद्योग करून, स्वतःची विक्री व्यवस्था उभी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानांतर्गत कृषी विभागामार्फत कुडाळ, ता. जावळी येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. जावळी तालुका कृषी अधिकारी तेजदीप ढगे यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेचा उद्देश व महत्त्व विशद केले. कुडाळ कार्यक्षेत्रात 500 हेक्टरचे एकूण दहा शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहेत. या गटांचे प्रशिक्षण घेऊन पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले.
‘आत्मा’ प्रकल्प संचालक विकास बंडगर यांनी नैसर्गिक शेती योजनेत राबवायच्या घटकांची माहिती दिली. शेतकरी निवड, गटस्थापना, नैसर्गिक शेतमाल शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, शेतकरी प्रशिक्षण, निविष्ठा उत्पादन, जमिनीचे प्रमाणिकरण व विक्री व्यवस्था निर्माण करणे, या विषयी मार्गदर्शन केले. प्रचलित शेतीतील वाढता उत्पादन खर्च, आरोग्यास हानिकारक अन्ननिर्मिती आणि पर्यावरणावर दुष्परिणाम करणार्या शेतीऐवजी नैसर्गिक शेती ही शाश्वत आणि शेतकर्यांना आर्थिक हमी देणारी असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. संग्राम पाटील यांनी नैसर्गिक शेतीमध्ये पिकाचे पोषण आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी गांडूळ खत, कंपोस्ट खतनिर्मिती व वापर या विषयी मार्गदर्शन केले. शेतातील व परिसरातील उपलब्ध पिकांचे अवशेष, गवत, झाडांचा पालापाचोळा, पाळीव जनावरांनी चारा खाल्ल्यानंतर उर्वरित अवशेष, घरातील बायोवेस्ट यांचा वापर करून उत्कृष्ट खतनिर्मिती करता येते, असे त्यांनी सांगितले.
पुणे कृषी महाविद्यालयाचे डॉ. कुंभार यांनी नैसर्गिक शेतीमध्ये जैविक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके व पीक सबंधंके यांचा वापर आणि शेतात त्यांची निर्मिती याविषयी मार्गदर्शन केले. जावळी पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र परामणे, वाईचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, कुडाळचे मंडल कृषी अधिकारी संजय घोरपडे, शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख कमलाकर भोसले, उपस्थित होते.