Delhi : येत्या 13 फेब्रुवारीला पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यासाठी दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. एकीकडे अंबाला-पटियाला सीमा बंद करण्यात आली आहे. तसेच अंबाला, कुरुक्षेत्र, कठियाल, जिंद, हिसार, फतेहबाद आणि सिरसा या सात जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. आजपासून तीन दिवस येथील इंटरनेट सेवा बंद असणार आहे.
शेतकऱ्यांना हरियाणात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी पंजाबवरुन दिल्लीला जाणारा जीटी रोडही बंद केला आहे. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. मोबाईल फोन आणि SMS वर WhatsApp, Facebook Twitter इत्यादी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे चुकीची माहिती आणि अफवा पसरवण्यापासून रोखण्यासाठी इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
हरियाणा राज्यातील अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिसार, फतेहाबाद आणि सिरसा जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेचा कोणताही भंग होऊ नये म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते 13 फेब्रुवारी रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत लागू असणार आहे.
शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चामुळे अंबाला, जिंद आणि फतेहाबाद जिल्ह्यांमध्ये पंजाब आणि हरियाणामधील सीमा सुरक्षित करण्यासाठीही उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दलांच्या 50 तुकड्या तैनात केल्या आहे.
यापूर्वी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकार कोंडीत सापडले होते. शेतकऱ्यांची ट्रॅक्टरसह महामार्गावर ठिय्या देत दिल्लीची सीमा रोखून धरली होती. या आंदोलनामुळे केंद्र सरकारची प्रचंड नाचक्की झाली होती. त्यामुळे या आंदोलनाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हरियाणा सरकारकडून वेगाने पावले उचलली जात आहे.
शेतकऱ्यांच्या कोणत्या मागण्या आहेत?
शेतकऱ्यांना पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) देण्यासाठी विविध कायदे बनवण्यासाठी या संघटना आग्रही आहेत. त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमाफी या मागण्यांसाठी 13 फेब्रुवारीला संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा या संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.