वाल्हे (वार्ताहर): निसर्ग चक्रीवादळापासून जिल्ह्यात पाऊस बरसत आहे. मात्र, पुरंदर तालुक्यातील वाल्हे परिसर हा अद्याप पावसासाठी आसुलेला आहे. बाजारीचे आगार असलेल्या या परिसरात सुमारे 2200 एकर क्षेत्रात बाजरीची पेरणी केली जाते. यावर्षी शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकरी सज्ज असूनही पेरणीपूरक पाऊस झाला नसल्यामुळे चिंतातूर झाला आहे.
मागील वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके वाया गेली होती. अनेक शेतकऱ्यांची पिके शेतामध्येच कुजून गेली होती. यानंतर काही प्रमाणात शेतकरी अवकाळी पावसातून सावरत असतानाच करोनाच्या महामारीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तयार झालेल्या शेतीमालास बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीलाच थोड्या पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी आशावादी बनला होता. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे वाल्हे परिसरामधील बळीराजा चिंताग्रस्त बनला आहे. एकीकडे मशागतीची सर्व कामे पूर्ण झाली तरी पेरणीयोग्य पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. पाऊस सुरू होईल, या आशेने मशागतीची कामे वेगाने केली. उसनवारी करून खते, बियाणांचे नियोजनही केले आहे. काही वर्षांपासून शेतकऱ्यांना अनेक समस्या सहन कराव्या लागत होत्या.
उन्हाळी हंगामात घेतलेले रब्बी पिके, मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाली. शेतकऱ्यांना निसर्गही साथ देत नसून शासनही वेळोवेळी मदत करीत नाही. अशा परिस्थितीत दाद कुणाकडे मागायवी, अशा प्रश्न शेतकऱ्यांपुढे ठाकला आहे.
परिसरामध्ये पावसाळ्यात प्रामुख्याने बाजरीचे पीक घेतले जाते. जवळपास 865 हेक्टर जमिनीवर बाजरीचे पीक घेतले जाते. यावर्षी परिसरामध्ये मान्सूनपूर्व पाऊस अतिअल्प प्रमाणात झाला. जून महिन्यात सुरूवातीला पाऊस पडल्यानंतर बाजरीची पेरणी करतात. यंदा मात्र, पावसाने दडी मारल्याने बाजरीची पेरणी अजून लांबली आहे.
वाल्हे परिसरामध्ये खरीप हंगामात प्रामुख्याने, बाजरी, सूर्यफूल, मूग, मटकी, चवळी, तुर, भुईंमुग, उडीद आदी पिके घेतली जातात. मात्र, अजूनपर्यंत पेरणीयुक्त पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.