पुणे – तीन-तीन लग्न करूनही पत्नी नांदत नसल्याने नैराश्येत येऊन पतीने जंगलात जाऊन टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. गळफास घेऊन त्यांनी आपले जीवन संपवले आहे. शेखर शांताराम पवार (वय 28) असे मृत तरूणाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून शेखर बेपत्ता होते. त्यासंदर्भात त्यांच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलीसांनी तपास केला असता आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा गावाजवळील जंगलात शेखर यांचा मृतदेह सापडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील रहिवासी शेखर पवार यांना तीन पत्नी होत्या. ते कामानिमित्त आंबेगाव तालुक्यातील पारगाव राहत होते. त्यांची तीन लग्न झाली होती. मात्र तिन्ही पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हत्या. या कारणामुळे ते नैराश्येत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी घरदेखील सोडले होते. नैराश्येत घर सोडून गेल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र ते सापडले नाही. त्यानंतर शेखर यांच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलीसांनी तपास सुरु केला असता आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा गावाच्या जवळ जंगलात शेखर यांचा सांगाडा लटकल्याचे दिसले. पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांनी या मृतदेहाची पाहणी केली. मृतदेहाजवळ काही कागदपत्रे सापडली. त्यावरून मृतदेह शेखर यांचा असल्याची ओळख पटली. वडिलांनीही ओळख पटवली. शेखरच्या खिशात पोलिसांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड सापडले. शेखर हा दोन महिन्यांपूर्वी घरातून आत्महत्या करतो म्हणून निघून गेला होता. जाताना त्याने दोरीदेखील सोबत नेली होती, असे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे. या प्रकरणामुळे कुटुंबियावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.