मुंबई – अतिवृष्टी-बोंडअळीमुळे कापूस-सोयाबीनचे प्रचंड नुकसान झालेले असताना सुद्धा विदर्भातील शेतकऱ्यांना कुठलीही मदत नाही. शेतमाल खरेदी सुद्धा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे अन्य अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच दिवाळी 7 दिवसांवर आली असून ही कारवाई त्वरेने पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी करोनावर मात केल्यानंतर पुन्हा कामाला लागले असून आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. फडणवीस यांनी पत्रात नमुद केले की, बोंडअळी, बोंडसडीमुळे यंदा विदर्भात कापसाचे मोठे नुकसान झालेले आहे.
आताच्या अनुमानानुसार 50 टक्क्यांहून अधिक नुकसान असून, ते आणखी वाढत जाणार आहे. बोंडअळीने कापूस नष्ट झाला. बोंडसडीत वरून बोंड चांगले दिसत असले तरी ते फोडताच कापूस सडलेला असतो. यंदा बोंडसडीचा प्रकार सर्वत्र आढळून येतो आहे. साधारणत: एकरी 6 क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना अनेक ठिकाणी एकरी 1 क्विंटल आणि फार कमी ठिकाणी 2 क्विंटलपर्यंत उत्पादन होताना दिसून येत आहे. अतिवृष्टीने सोयाबीनचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनचे नुकसान जवळजवळ 80 टक्क्यांच्या आसपास आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात ही स्थिती आहे. इतकी गंभीर स्थिती असतानाही कुठेही सरकारच्या वतीने प्रशासनाला कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
तसेच स्थानिक प्रशासन पंचनामे करीत असले तरी त्याचा कोणता फायदा होईल, अशी स्थिती जाचक अटींमुळे नाही. अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात जो शासन आदेश काढण्यात आला, त्यात विविध निकष ठेवल्याने विदर्भातील बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत, असेही त्यांनी नमुद केले आहे.