कर्जत -कुकडीचे नियोजित उन्हाळी आवर्तन रविवारी (दि. 7 रोजी) सोडण्यात आले असुन आता शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा उन्हाळी आवर्तनाचा लाभ मिळणार आहे. गेली काही दिवसांपासून कुकडीच्या पाण्यावर चांगलेच राजकारण तापले होते मात्र ठरल्या वेळेतच कुकडीचे दुबार आवर्तन सुटल्याने सर्वच चर्चांवर विरजनण पडले आहे.
कर्जतसाठी आमदार रोहित पवार तर श्रीगोंदा तालुक्यासाठी माजी आमदार राहुल जगताप व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार कुकडी प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या तालुक्यांना आपल्या हक्काचे पाणी मिळावे, यासाठी पाठपुरावा करत आहेत. कोणावर अन्याय होऊ नये आणि सर्व तालुक्यांना आपल्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी आ. रोहित पवारांनी आपली वेळोवेळी भुमिका मांडली होती.
जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक खलील अन्सारी, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ तसेच सबंधित अधिकारी पदाधिकारी व आ. रोहित पवार, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार यांच्या उपस्थितीत दि. 7 मे रोजी झालेल्या बैठकीत जूनला आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. काही दिवसातच हे पाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांनी देखील पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असून या पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी ज्या त्या भागातील शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.