नवी दिल्ली – देशात लागू केलेले नवीन तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. येत्या अधिवेशनात हे कायदे मागे घेतले जाणार असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे. कृषी कायदे रद्द केल्याच्या या निर्णयावर अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे.
‘तीन कृषी कायदे मागे घेतल्याबद्दल नाराजी आणि निराशा व्यक्त करत कंगनाने लिहिले की, दुःखद, लज्जास्पद आणि चुकीचे…संसदेत बसून सरकारऐवजी रस्त्यावर बसलेले लोक कायदे करू लागले तर हाही जिहादी देश आहे. ज्यांना हे हवे आहे त्या सर्वांचे अभिनंदन.’ अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याच्या या महामोहिमेत देशात तीन कृषी कायदे आणण्यात आले होते. देशातील शेतकर्यांना विशेषत: लहान शेतकर्यांना अधिक बळ मिळावे, त्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि शेतमाल विकण्याचे अधिकाधिक पर्याय उपलब्ध व्हावेत, हा उद्देश होता.
वर्षानुवर्षे देशातील शेतकरी, देशातील कृषी तज्ज्ञ, देशातील शेतकरी संघटना सातत्याने ही मागणी करत आहेत. यापूर्वीही अनेक सरकारांनी यावर विचारमंथन केले होते. यावेळीही संसदेत चर्चा झाली, मंथन झाले आणि हे कायदे आणले गेले. देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक शेतकरी संघटनांनी त्याचे स्वागत व पाठिंबा दिला. त्या सर्वांचा मी आज खूप ऋणी आहे.
आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला सांगण्यासाठी आलो आहे की, आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू. अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली आहे.