नवी दिल्ली – करोनाबाबत सध्या पसरत असलेल्या खोट्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होते आहे. त्यामधील सत्य लोकांसमोर आणण्यासाठी केंद्र सरकारने 24 तासांच्या आता एक पोर्टल सुरू करावे, अशा अर्थाची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. लोकांमध्ये निर्माण होणाऱ्य घबराटीमुळे विषाणूपेक्षाही अधिक नुकसान होईल. त्यामुळे केंद्र सरकारने या बनावट बातम्यांची तातडीने दखल घ्यावी. प्रवासी कामगार देशभर पसरलेले आहेत.
त्यांच्यातील अस्वस्थता कमी करण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशकांची अणि सर्व धर्माच्या सामाजिक नेत्यांची मदत घ्यावी, अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. प्रवासी कामगार एका ठिकाणी थांबावेत. त्यासाठी त्यांच्या अन्न, निवारा आणि किमान आवश्यक गरजांसह वैद्यकीय सुविधाही त्यांना उपलब्ध करून दिली जावी, अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. प्रवाशांना स्वच्छतेसाठी पाणी आणि जंतूनाशके शिंपडणे वैज्ञानिकदृष्ट्या हा योग्य मार्ग नाही, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
दरम्यान प्रवासी कामगारांबाबतच्या प्रश्नांवर उच्च न्यायालयांमध्ये सुनावणी न करू देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. उच्च न्यायालयांमध्ये सुनावणी होणाऱ्या प्रकरणांवर आपली देखरेख असेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.