श्रीकांत कात्रे
सातारा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सातारा जिल्हा दौरा जिल्ह्याच्या राजकारणाल गती देणारा ठरणार आहे. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ल्याला ते सुरुंग लावून गेले आहेत. जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा आणि विधानसभेच्या आठपैकी सहा जागा भाजपकडेच येतील अशा प्रकारची व्यूहरचना आखून ते मुंबईला परतले. अर्थातच या सुरूंगाची वात पेटती राहणार की फुसकी ठरणार हे काळ ठरवणार आहे.
हे आव्हान भाजपलाच किती पेलेल याची खात्री नसली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आता हालचाली गतीमान होतील अशीच शक्यता आहे. दहिवडी आणि कराड या दोन्ही ठिकाणी फडणवीसांच्या सभांना झालेली गर्दी म्हणजे भाजपच्या जुन्या लोकांनाही आश्चर्य वाटावे अशी घटना आहे. अर्थातच आमदार जयकुमार गोरे यांनी जिल्हाध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून त्यांनी आक्रमकपणे केलेली पेरणी आता दिसू लागली आहे. मात्र, फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आणखी मोठा संघर्ष करावा लागणार आहे, हेही तितकेच खरे आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्यादृष्टीने भाजपने सातत्याने सुरू केलेल्या प्रयत्नांना श्री. फडणवीस यांच्या दौऱ्याने आणखी उभारी मिळाली आहे. केंद्रीय मंत्र्यांचे दौरे, बूथप्रमुखांच्या बैठका, तालुकावार संपर्क यातून भाजपने पक्ष लोकांपंर्यंत पोहचविण्याचा धडाका गेल्या काही महिन्यांपासून सुरु ठेवला आहे.
त्यातही जिल्ह्यासाठी असलेली कोअर कमिटी सतत क्रियाशील राहण्यासाठी फडणवीस यांनी प्रमुख नेत्यांना दिलेल्या कानपिचक्या पक्षाला मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. भाजपच्या या हालचाली एका बाजून गती घेत असताना दुसऱ्या बाजूने वर्चस्व असणारी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजूनही आपल्याच तोऱ्यात मशगुल आहे. आतापर्यंत समोर पर्यायच नव्हता, असे वाटत असल्यामुळे आलेली ही सुस्ती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पीछेहाटीला कारणीभूत ठरु शकते, याचा अंदाजही या पक्षाच्या नेत्यांना आलेला नाही. पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीत दोन्ही खासदार आणि दहापैकी नऊ आमदार जिंकणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद नंतर हळूहळू कमी होत गेली आहे. आठपैकी फलटण, वाई आणि कराड उत्तर असे तीनच मतदारसंघ या पक्षाकडे उरले आहेत. असे असतानाही आपल्यापुरते राजकारण करणाऱ्या नेतेमंडळींना पक्षाबाबतची चिंता राहिलेली नाही.
याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, हे भाजपच्या हालचालींवरून स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मानणारा जिल्हा आता भाजपमय होणार का मरगळ झटकून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकजुटीने निवडणुकीची तयारी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील मरगळ आणि क्षीण झालेली कॉंग्रेस या गोष्टींचा फायदा मिळविण्यासाठी टपलेल्या भाजपला स्वतःच्या बळावर वर्चस्व मिळविणे शक्य होईल का, या प्रश्नाचे उत्तर अजून तरी खात्रीलायकरित्या देता येणे शक्य नाही. कारण भाजपमध्ये असलेले प्रमुख नेते पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनच आलेले आहेत. आणि मूळ भाजपमध्ये अशा मातब्बर नेत्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही नाही. सत्तेसाठी सारे काही यावर आधारित राजकारणात आजची स्थिती उद्या असत नाही. आज भाजपमध्ये असणारे नेते व कार्यकर्ते उद्या तिथेच असतील, असे सांगता येत नाही.
आणि आज भाजपकडे नसणारे उद्या भाजपमध्ये असू शकतात हेही होऊ शकते. तरीही या जर तरच्या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी भाजपची फुगलेली ताकद हवा भरल्यासारखी आहे. सातारा मतदारसंघात राजेगट भाजपमध्ये असल्यामुळे तिथे भाजप आहे. उद्या तो गट दुसऱ्या पक्षात गेला की भाजप शून्य उरते. माणध्येही तीच स्थिती आहे. वाई, फलटण, कराड उत्तरमध्ये भाजपची डाळ शिजणे सोपे नाही. कारण तिथे राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रबळ तर आहेच. पण भाजपची ताकदही विचारात घेण्यासारखी आहे. वाईमध्ये भाजपचे संघटन, संपर्क नाहीच. फलटणमध्ये खासदार गट झगडतोय. पण वरचष्मा राजेगटाचाच आहे. कराड उत्तरमध्ये भाजपच्याच दोन नेत्यांमध्ये चुरस आहे. कराड दक्षिणमध्ये कॉंग्रेसला आव्हान द्यायचे असले तरी भाजपच्या उमेदवाराचा पक्षांतर्गत आणि लोकांमधील संपर्कही किती प्रभावी ठरेल हे सांगता येत नाही.
कोरेगाव व पाटण हे दोन मतदारसंघ शिवसेनेकडे (शिंदे) आहेत. त्यात सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाचे राजकारण पुन्हा वेगळे आहे. पंतप्रधानांची सभा होऊनही साताऱ्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसला विजय मिळतो, यातच सारे काही आहे. म्हणजेच राष्ट्रवादी कॉंग्रेस सध्या गाफिल असली तरी ती उद्या मरगळलेलीच असेल असे नाही. या शक्यता लक्षात घेतल्या तर फडणवीसांनी निर्माण केलेली हवा निवडणुकीपर्यंत टिकविणे हेच पक्षापुढे आव्हान असणार आहे. त्यामुळे जयकुमार गोरे यांना आणखी खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यांचा आक्रमकपणा योग्य पद्धतीने दिसत राहिला तरच भाजपला आव्हान पेलणे शक्य होणार आहे.