डॉ. जयदेवी पवार
गरीब, अनाथ, निराधार कुटुंबातील मुलींची तस्करी ही नेहमीच चिंतेची बाब मानली गेली आहे. त्यामुळे अल्पवयीन बरोबरच महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.
देशात केवळ मुलींचीच संख्या कमी नाही तर ते बेपत्ता होण्याचे प्रमाणही चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. बालमजुरी आणि वेश्याव्यवसायात बेपत्ता मुलींना ढकलण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव सांगितले जात आहे. नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो (एनसीआरबी)च्या अहवालात काही खळबळजनक माहिती उघडकीस झाली आहे. 2020 या वर्षात 845 अल्पवयीन मुली तर 18 पेक्षा अधिक वयोगटातील 1952 महिला बेपत्ता झाल्या.
अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण केरळ राज्यात सर्वाधिक 156 आहे तर झारखंड 98 आणि ओडिशा 81 मुली गायब झाल्या आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रात सर्वाधिक 462, तेलंगणातून 393, ओडिशातून 206 आणि आंध्र प्रदेशातून 204 महिला गायब झाल्या आहेत. विशेष म्हणजे देशभरात 2019 मध्ये 48,972 अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झालेले असताना करोना काळात ही संख्या आश्चर्यकारकरित्या वाढली. 2020 मध्ये हीच संख्या 59,262 वर पोहोचली.
केंद्रीय गृहमंत्रालयांर्तगत असलेल्या “एनसीआरबी’च्या अहवालानुसार बेपत्ता होण्यात सर्वाधिक अल्पवयीन मुली या मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशातील आहेत. या प्रकरणात मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यांना देहविक्री आणि बालमजुरीत ढकलण्यात येत असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. मानवी तस्करी विरोधी युनिटच्या तपासात 1466 प्रकरणाचे कनेक्शन
वेश्याव्यवसायापर्यंत असल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकारचे सर्वाधिक केसेस महाराष्ट्र 541, तेलंगणात 362 आणि आंध्र प्रदेशात 200 आहेत; परंतु मानवी तस्करी ही केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आशिया खंडात वेगाने वाढत चालली आहे आणि याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हा बेकायदा धंदा कोट्यवधी रुपये कमावण्याचा मार्ग झाला आहे. समाजात मानवी तस्करीचा गोरखधंदा वेगाने वाढत चालला आहे. हा व्यवसाय मानवता, सभ्यता आणि कायदा व व्यवस्थेबरोबरच आपल्या धार्मिक मूल्यांना हानी पोहोचवत आहे. त्यामुळे सामाजिक व्यवस्थेचे समतोल ढासळत चालला आहे.
भारताच्या विविध राज्यांत जसे की दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आदींत अन्य राज्यांतील गरीब, निराधार कुटुंबातील मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेण्यात येते. हे समाजकंटक मुलींची तस्करी करतात आणि त्यांना मुंबई, कोलकाता किंवा परदेशात पाठवतात. काहीवेळा खोटेनाटे लग्न लावून अन्यत्र नेण्यात येते. त्यानंतर मोठी रक्कम घेऊन त्यांना अन्य राज्यांत विकण्यात येते.
पूर्वोत्तर राज्य पश्चिम बंगाल, ओडिशातील महिला आणि मुली तसेच पंजाब आणि हरियाणासह महिला-पुरुष यांचे विषम प्रमाण अधिक असलेल्या राज्यांत जबरदस्तीने विवाह केला जातो. अशा प्रकारची प्रवृत्ती वाढण्यामागे प्रमुख कारण म्हणजे स्त्री भ्रूणहत्या. गेल्या काही वर्षांत अनेक राज्यांत स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण वाढले आहे. मुलगाच हवा, वंशाला दिवा हवा ही मनोवृत्ती अजूनही शिक्षित आणि अशिक्षित लोकांत छुप्या स्वरूपात दडलेली आहे.
त्यामुळे गर्भलिंगनिदान चाचणी केली जाते आणि मुलगा असला तरच गर्भ ठेवण्यात येतो अन्यथा गर्भपात केला जातो. या कारणांमुळे मुलींचे प्रमाण प्रचंड घसरले आहे. त्याचवेळी मुलींच्या विषम संख्येमुळे त्यांची तस्करांकडून खरेदी केली जात असून शहरातील मोठमोठे हॉटेल, बार, डान्स क्लब, बॉडी मसाज सेंटरमध्ये कॉल गर्ल म्हणून वापर केला जात आहे.
त्यांना वेश्याव्यवसायात ढकलण्यात येत आहे. हा एक उत्पन्नाचा मोठा स्रोत म्हणून समाजकंटक त्याकडे पाहात आहेत. एवढेच नाही तर कमी वयाच्या मुलींना इंजेक्शन देऊन त्यांचे शरीर काळाच्या अगोदरच पूर्णपणे विकसित केले जात आहे. पैसा मिळवण्याच्या हव्यासापोटी समाजकंटक अतिशय खालच्या थराला पोहोचले आहेत. भारतीय महिला आणि मुलींसमवेत पश्चिम आशिया आणि एवढेच नाही तर युरोप आणि अमेरिकेत तात्पुरता विवाह करणे ही सामान्य बाब मानली जात आहे.
अशा विवाहांच्या माध्यामतून महिलांचे लैंगिक शोषणही होते. कौटुंबिक हिंसाचारापासून वाचण्यासाठी घरातून पळून जाणाऱ्या महिला आणि बालविवाहाला बळी पडलेल्या मुली या मानवी तस्कराच्या जाळ्यात अडकत आहेत. मोठमोठ्या शहरांत युवतींना मॉडेल करण्याचे, चित्रपटात काम मिळवून देण्याचे, नाटकात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले जाते. खोटेनाटे स्वप्न रंगविली जातात.
यास काही मुली बळी पडतात आणि नको त्या ठिकाणी अडकतात. एकंदरीत मानवी तस्करी रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन व्यापक मोहीम हाती घ्यायला हवी. केंद्र आणि राज्य सरकारांनी ग्रामीण पातळीवर गरिबांना आत्मनिर्भर करण्यासाठी स्वयंरोजगार स्थापन करण्याच्या हेतूने कुटीर उद्योग आणि व्यवसाय स्थापन करण्यासाठी युद्धपातळीवर काम करायला हवे.
कौटुंबिक हिंसाचार संपवण्यासाठी कायदेशीर पातळीवर व्यापक अभियान राबवण्याची गरज आहे. हुंडाप्रथेचे उच्चाटन करायला हवे. मानवी तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना, समाजकंटकांना तातडीने शिक्षा दिल्यास अशा अपप्रवृत्तींना वेळीच पायबंद बसू शकतो.