स्थानिक बाजारपेठेत विक्री : शेतकऱ्यांना कोटींचा फटका
परकीय चलनावर इंदापूरच्या शेतकऱ्यांनी सोडले पाणी
भवानीनगर (वार्ताहर) – इंदापूर तालुक्यातून परदेशात उच्च प्रतीची द्राक्षे एक्सपोर्ट केली जातात. परंतु सध्या एक्सपोर्ट द्राक्षांचा दर हा कमी असल्याने शेतकरी द्राक्ष व्यवसायात अडचणीत सापडला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्याला द्राक्षांतून मिळणाऱ्या परकीय चलनावर पाणी सोडावे लागत आहे. यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे एक कोटींचा फटका बसला आहे.
इंदापूर तालुक्यात साधारण तीन हजार एकरांपेक्षा जास्त द्राक्षबागा आहेत. यामध्ये जम्बो आणि माणिक चमन या जातीच्या द्राक्षांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु यावर्षीच्या वातावरणातील बदलामुळे द्राक्षबागांचे नुकसान होऊन एकरी उत्पादनात घट होऊन फक्त दोन ते तीन टन एवढीच द्राक्ष उत्पादन होत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. जम्बो द्राक्षे एक्सपोर्ट केली असता एका किलोसाठी 80 ते 100 रुपये एवढा दर मिळत आहे. लोकल बाजारभावात विकली असता एका किलो फक्त पन्नास ते सत्तर रुपये शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहेत. त्याचप्रमाणे माणिक चमन ही द्राक्ष एक्सपोर्ट केली असता त्याला एका किलोस साठ रुपये दर मिळत आहे. लोकल बाजारात विकली असता चाळीस ते पन्नास रुपये एवढाच दर मिळत आहे. त्यामुळे यावर्षी द्राक्ष बागा इंदापूर तालुक्यातील शंभर पैकी साठ ते सत्तर टक्के वाया गेल्या आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
दरवर्षी द्राक्ष बागेवर कोणते ना कोणते तरी संकट येत आहे. द्राक्षबागेचे उत्पादन वर्षानुवर्षे घटत चालले आहे. दरही योग्य प्रमाणात मिळत नसल्याने द्राक्षबागांच्या उत्पादनांमध्ये शेतकरीवर्ग हा जास्तीत जास्त आर्थिक अडचणीत जात आहे. शेतकरी या द्राक्षबागेच्या चक्रव्यूहातून कधी बाहेर पडणार आणि द्राक्ष बागेला कधी चांगले दिवस येणार, हाच विचार शेतकरी करीत आहे.
– सोपान पवार, शेतकरी, काझड.