कामशेत, (वार्ताहर) – उन्हाळा सुरू झाल्यामुळे थंड पाण्यासह विविध शीतपेयांची मागणी वाढली आहे. परंतु, बाटलीबंद पाणी असो किंवा अन्य शीतपेय यांची छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत आहे. कुलिंग चार्जेसच्या नावाखाली एका बाटलीमागे पाच ते दहा रुपये दुकानदार जास्तीचे घेत आहेत.
नियमानुसार पाकीटबंद, बाटलीबंद वस्तू किंवा पदार्थ हा छापील किमतीनुसारच विक्री करणे बंधनकारक आहे. परंतु असे असताना उन्हाळ्यात शीतपेयांची विक्री ही छापील किमतीपेक्षा अधिक दराने होत आहे.
कुलिंग चार्जेसच्या नावाखाली हे वाढीव पैसे घेण्यात येत असल्याचे दिसून येते. दुकानदारांना कंपनीकडून कुलिंग चार्जेसची रक्कम जाते. त्यामुळे चार्जेस देण्याची गरज नसल्याचे नियम सांगतो.
पैसे जास्त घेतल्यास तक्रार कोठे कराल?
छापील किमतीपेक्षा अधिक दराने पदार्थाची विक्री करणे बेकायदेशीर आहे, अशा पद्धतीने वाढीव दराने शीतपेयाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध ग्राहक पंचायतीकडे ग्राहक तक्रार करू शकतात. प्रत्येक नागरिकाने ग्राहक अधिकारांविषयी जागरुक राहणे गरजेचे आहे. वस्तू किंवा सेवा खरेदी करताना मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे घेतले असल्यास ग्राहक पंचायतीकडे दाद मागता येते.