पुणे – प्राथमिक शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी 10 ऑक्टोबरला होत आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत उद्या (दि.25) संपणार आहे. त्यानंतर अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, आता उमेदवारांना
दि.5 सप्टेंबरपर्यंत टीईटीसाठी अर्ज करता येणार आहे.
टीईटी बऱ्याच कालावधीनंतर घेण्यात येत आहे. करोनामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. टीईटीसाठी नोंदणी प्रक्रिया 3 ऑगस्टपासून झाली होती. टीईटीसाठी अर्ज करण्यासाठी 25 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. मात्र, आणखी मुदत देण्याची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मुदतवाढ देत उमेदवारांना दिलासा दिला आहे.
दरम्यान, साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही उमेदवार एका गटाची परीक्षा देतात, तर काही दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या संकेतस्थळावरून उमेदवार अर्ज करू शकतील.
तसेच, टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा म्हणजेच डी.एड. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
परीक्षेच्या तारखेत बदल होणार का?
केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) पूर्व परीक्षा आणि टीईटी एकाच दिवशी 10 ऑक्टोबर रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर टीईटीच्या तारखेत बदल करण्याची मागणी यापूर्वीच परीक्षा परिषदेकडे करण्यात आली आहे. मात्र, परिषदेने हा तारखेत बदल केला नाही. यावरून परिषदेला उमेदवारांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे टीईटीच्या तारखेत बदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.