पुणे – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रस्तावित रिंगरोडची नव्याने आखणी करण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यावरून संघर्षाची ठिगणी उडण्याची चिन्हे आहेत.
“शेतकऱ्यांना देशोधडीला लावून केलेला विकास आम्हाला अमान्य आहे. अनेक बड्या लोकांचे फार्म हाऊस वाचविण्यासाठी नव्याने रिंगरोडची आखणी करण्यात आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बाधित होत आहेत. जुन्या आराखड्यानुसारच रिंग रोड करा,’ अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
तसेच “जर तुम्ही तसे करणार नसाल, तर आमचा कडवा विरोध असेल,’ अशा शब्दांत पाटील यांनी रिंगरोडला विरोध दर्शविला आहे.
रिंगरोडमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसोबत घेऊन आमदार पाटील यांनी नवीन प्रशासकीय इमारती येथे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला आमदार भीमराव तापकीर, पुणे शहर भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, आदींसग रांजे, कुसगाव, रहाटवडे, मांडी, बहुली, मुठा, सांगरुण, कातवडी, वरदाडे, खामगाव मावळ, शिवगंगा खोऱ्यातील खोपी, कांजले, केलवडे व भोर यागावांमधील अल्पभूधारक शेतकरी उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रिंगरोडचा जो आराखडा तयार केला होता, त्यात शेतकऱ्यांवर अन्याय होत नव्हता. मात्र, महाविकास आघाडी सरकारने काही जणांचे हित डोळ्यांसमोर ठेवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा घाट घातला आहे. अशाप्रकारे जर विकासकामे राबवली जाणार असतील; तर ते आम्हाला अमान्य आहे.’
विद्यमान राज्य सरकार “हम करे सो कायदा’ या भूमिकेत आहे. त्यामुळे विकासाभिमुख प्रकल्प तयार करण्याऐवजी, काही जणांचे हितसंबंध जपण्यासाठी काम होत आहे. या धोरणामुळे जनता देखील त्रस्त आहे. आगामी काळात जनताच त्यांना जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असेल.
– चंद्रकांत पाटील, आमदार तथा प्रदेशाध्यक्ष, भाजप