नवी दिल्ली – भारताने 400 अब्ज डॉलर किंमतीच्या वस्तू निर्यातीचे उद्दीष्ट निर्धारीत वेळापत्रकाच्या नऊ दिवस आधीच पूर्ण केले आहे. भारताने वस्तू निर्यातीबाबत महत्त्वाकांक्षी उद्दीष्ट निश्चित केले होते आणि ते उद्दीष्ट साध्य केले आहे. या कामात महत्त्वाचे योगदान देणारे देशातील शेतकरी, विणकर आणि छोट्या व लहना उद्योगांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
चालू आर्थिक वर्षात भारताने 650 अब्ज डॉलरच्या निर्यातीचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यापैकी सेवा क्षेत्राला 250 अब्ज डॉलरचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत वस्तू व उत्पादनांची निर्यात 300 अब्ज डॉलरवर पोचली. केवळ डिसेंबर महिन्यातच 37 अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात झाली.
यासंदर्भातील ट्विट करताना मोदींनी एक ग्राफिक्सही पोस्ट केले आहे. त्यानुसार केंद्र सरकारने राज्य सरकारे व जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधून निर्यातदारांच्या समस्या झटपट दूर करण्याबरोबरच निर्यात चालना परिषद, विविध औद्योगिक संघटना आणि इतर घटकांशी संपर्क ठेवल्याने हा टप्पा गाठणे शक्य झाले आहे.
दर महिन्याला सरासरी 33 अब्ज डॉलरची म्हणजेच दिवसाला साधारणपणे एक अब्ज डॉलरच्या वस्तू-उत्पादनांची निर्यात होत राहिली. त्यामध्ये प्रामुख्याने पेट्रोलियम उत्पादने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, चामड्याच्या वस्तू, कॉफी, प्लॅस्टिक, तयार कपडे, मांस आणि दूध उत्पादने, तंबाखू यांचा समावेश आहे.