नवी दिल्ली – देशव्यापी लॉकडाऊनमधून कृषी-शेती आणि संलग्न सेवांना सरकारने सूट दिली आहे.देशातल्या शेतकरी वर्गाला येणाऱ्या समस्यांची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोणताही अडथळा न येता पिक कापणी सुरळीत सुरु राहणार आहे.
लॉकडाऊन लागू झाल्यापासून, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पिकांच्या कापणीसाठी आणि अन्नधान्याची बाजारपेठेपर्यंत वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी येऊ शकतात याबाबत माहिती घेतली होती. शेतकऱ्यांची आणि संबंधित संस्थांची मागणी आणि पंतप्रधानांच्या सूचना लक्षात घेऊन शेतकरी आणि संबंधित वर्गाचे हित राखत, हा व्यवहार्य तोडगा काढला आहे.
गृह मंत्रालयाने देशव्यापी लॉकडाऊन संदर्भातल्या 24 आणि 25 मार्च 2020 च्या आदेशाद्वारे जारी केलेलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कृषी उत्पादन खरेदी करणाऱ्या एजन्सी, कृषी उत्पन्न बाजार समित्या, शेत मजूर, कृषी यंत्राशी संबंधित कस्टम हायरिंग सेंटर, खते, कीटकनाशके आणि बियाणे उत्पादन आणि पॅकेजिंग युनिट, कापणी आणि पेरणीशी संबंधित यंत्रांची वाहतूक आदींना वगळले आहे.