मंचर,(प्रतिनिधी) – आंबेगाव, शिरूर तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने याचा मोठा फटका शेती पिकांना बसत असून शेतकऱ्यांना त्यांची पिके जगवणे कठीण झाले आहे. पाणी असूनही केवळ वीज नसल्यामुळे शेती पिके जळत आहे.
महावितरने आंबेगाव शिरूर तालुक्यातील गावांना वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा दि.१५ एप्रिलपासून शेतकऱ्यांना घेऊन महावितरणच्या मंचर येथील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन निकम यांनी कार्यकारी अभियंता मंचर शांताराम बांगर यांना दिले आहे.
निकम यांनी दिलेल्या निवेदनानुसार गेले १ महिन्यापासून काठापूर बु।।. २२० केव्हीं सबस्टेशन येथून आंबेगाव तालुक्यातील मंचर, पिंपळगाव, अवसरी बु., निरगुडसर, लोणी, रांजणी, शिंगवे, काठापूर दु॥. शिरुर तालुक्यातील कवठे येमाई, मलठण, जांबूत, पाबळ, कान्हूर मेसाई, पिंपरखेड व जुन्नर तालुक्यातील पारगाव मंगरुळ, अशा एकूण ३३ केव्हीच्या १५ सबस्टेशनला सातत्याने इनर्जन्शी लोड शेडींगचा सामना करावा लागत आहे.
या १५ सबस्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या जवळपास ५० गावांना याचा फटका बसत आहे. शेतीपंपाला दिवसा अथवा रात्री २ ते ३ तास देखील वीज मिळत नसलेमुळे शेतमाल पाणी असून वीज नसल्यामुळे जळत आहे. तसेच शेतीपंपदेखील जळण्याचे प्रमाण वाढले आहे. अधिका-यांकडे याबाबत चौकशी केली असता ते वरुन लोड शेडींग होत आहे, असे सांगत आहेत.
काठापूर बु।। २२० केव्ही लोणीकंद येथून वीजपुरवठा केला जात आहे. लोणीकंद हे ग्रामीण भागात शेतीसाठी व औद्योगिक भागासाठी वीजपुरवठा करणारे मोठे वीज केंद्र आहे. बाभळेश्वर मुख्य वीज केंद्रावरून आळेफाटा व नारायणगाव येथील वीज केंद्रावर जो वीज पुरवठा होत आहे तेथे इमर्जन्शी लोड शेडींग होत नाही व तेथे शेतीला ८ ते १० तास वीज पुरवठा होत आहे.
त्यामुळे काठापुर बु॥. २२० केव्ही सबस्टेशनवरुन वरील १५ उपकेंद्रांना शेतीसाठी ८ ते १० तास वीजपुरवठा येत्या ८ दिवसांत सुरळीत करावा. अन्यथा दि.१५ एप्रिल (सोमवार) पासून आंबेगाव शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन कार्यालयासमोर (मंचर कार्यकारी अभियंता) बेमुदत धरणे आंदोलन करण्यासाठी बसणार असल्याचा इशारा निकम यांनी दिला आहे.