मुंबई : ‘हिंमत असेल तर माझे सरकार पाडा’, असे थेट आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपला दिले होते. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सरकार आम्ही पाडणार नाही पण हे सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही, असा टोला लगावला आहे.
रामदास आठवले म्हणाले कि, .भाजप शिवसेना २५-३० वर्ष हिंदुत्वावर एकत्र होते. संघाकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. संघात सगळे तयार झाले आहेत. मग भाजपवर टीका करताना शिवसेनेचे हिंदुत्व वेगळे कसे? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
सरकार पडेल इतिहास घडेल. महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार नाही. हे सरकार स्वतः पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे एक दिवस भूकंप होणार असल्याचा इशाराही आठवलेंनी दिला.
दरम्यान, जीएसटी कायदा रद्द करण्याची गरज नाही. जीएसटी पैसा मिळाला पाहिजे या उद्धव ठाकरे यांच्या मताशी सहमत असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आठवले म्हणाले.