“श्री छत्रपती’समोर संतप्त कामगारांची निदर्शने
भवानीनगर – गेले तीन महिने श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना पगार न दिल्याने आज कारखान्याच्या गेट समोर कामगारांनी आंदोलन करून पगाराबाबत मागणी केली. यावर कारखान्याच्या वतीने सर्व संचालक मंडळाने निर्णय घेऊन येत्या 20 फेब्रुवारी रोजी एक पगार आणि महिन्याच्या शेवटपर्यंत एक पगार असे देण्याचे कबूल केल्याने हे कामगारांचे आंदोलन मागे घेण्यात आले.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये काम करत असणारे कामगारांना गेले तीन महिने पगार दिला गेला नसल्याची ही श्री छत्रपती साखर कारखाना उभारल्यापासून म्हणजे 65 वर्षांतील पहिलीच घटना असल्याने नक्की श्री छत्रपती साखर कारखान्याची वाटचाल कोणत्या दिशेने चालू आहे असाही सवाल साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील कामगारांना तीन महिने पगार दिलेला नाही. संक्रात वेळी ऍडव्हान्स दिलेला नाही. तीन वर्षाचा दिवाळी बोनस फायनल नाही, कारखाना पतपेढीतील काढलेले कर्ज हे कामगारांच्या पगारातून हप्त्यापोटी कट केले जात आहे; परंतु सात महिने होऊन गेले पतपेढीमध्ये पैसे कारखान्याने न भरल्याने त्याचेही व्याज विनाकारण कामगारांच्या वरती पडलेले आहे. तसेच दहाव्या महिन्यापासून कामगारांच्या फंडाचे व एलआयसीचे पैसे ही गेलेले नाहीत. मात्र हे पैसे पगारातून कापले गेले आहेत. इतर ठिकाणाहून कामगारांनी काढलेले कर्ज त्याचे हप्तेही केवळ पगार न मिळाल्याने थकले आहेत. या सर्व त्रासाचा आज उद्रेक झाला.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर सर्व कामगारांनी मिळून पगारासाठी आंदोलन केले. आंदोलनास कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, बाळासाहेब कोळेकर, सतीश काटे, विठ्ठलराव निंबाळकर, आबासाहेब निंबाळकर, अशोक काळे, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती साखर कारखाने इतर कारखान्यांच्या तुलनेत सभासदांच्या ऊसाला दरही कमी दिला आहे. कामगारांनाही पगार नाही. ऊसतोड मजुरांचीही काही प्रमाणात पैसे देण्याचे राहिले आहे. दर महिन्याच्या सात तारखेला कामगारांचा पगार होत असतो. ही परंपरा मोडीत काढून सलग तीन महिने पगार दिल्याचा उच्चांक या संचालक मंडळाने केलेला आहे.
श्री छत्रपती सहकारी कारखान्याकडून एफआरपीची रक्कम व्याजाची राहिलेले आहे, अजून अदा केलेली नाही. कारखाना सुरू आहे ऊसाचे गाळप केले जात आहे. कामगार काम करीत आहेत. मग नक्की श्री छत्रपती साखर कारखाना आर्थिक अडचणीत का? हा प्रश्न सर्व सभासदांच्या पुढे पडलेला आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला 65 वर्षे झाली या 65व्या वर्षाच्या ऊस गाळपाच्या हंगामात सध्याच्या संचालक मंडळाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. कामगारांना तीन महिने होऊन गेले पगार नाही. त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाचे, एलआयसीचे, पतपेढीचे हप्ते भरले नाहीत. जीएसटी भरण्याची थकलेली आहे. या सर्व गोष्टी सध्या घडत असताना कारखान्यात गाळप सुरू आहे. साखर तयार होत आहे. कारखान्यात कामगार काम करीत आहेत. मग एवढे सगळे होऊनही कारखान्यातील पैसे जातात कुठे? आजची आर्थिक अवस्था पाहता कारखाना सध्यातरी दिशाहीन झालेला आहे.
-पृथ्वीराज जाचक, माजी अध्यक्ष साखर संघ.