धुळे – विधानसभा निवडणुकीआधीच विरोधकांनी पराभव मान्य केला आहे. त्यामुळेच कॉंग्रेस नेते राहुल गांधी बॅंकॉकला गेले आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष आताच निम्मा रिकामा झाला आहे, अशी खिल्ली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उडवली.
राहुल परदेश दौऱ्यावर असल्याचे वृत्त आहे. तर, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागल्याचे चित्र आहे. त्यावरून धुळे जिल्ह्यातील भाजपच्या एका प्रचारसभेत बोलताना फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधक पराभूत मानसिकतेत वावरत आहेत. राहुल बॅंकॉकमध्ये असल्याचे मला बातम्यांमधून समजले. विरोधकांचा पराभव होणार असल्याचे राहुल यांना ठाऊक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रचाराला येऊन पराभवाचा ठपका स्वत:वर कशासाठी घ्यायचा, असे त्यांना वाटत असावे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हिरीरीने प्रचार करत असले तरी पक्ष निम्मा रिकामा झाल्याची जाणीव त्यांनाही आहे. तो पक्ष निवडणुकीनंतर पूर्ण रिकामा होईल, असे फडणवीस यांनी म्हटले. आम्ही आता थकलो आहोत, या कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त जाहीरनाम्याचीही फडणवीस यांनी यावेळी खिल्ली उडवली. पराभव निश्चित असल्याने आणि कुठलीच पूर्तता करायची नसल्याने विरोधकांनी जगातील सर्व आश्वासने दिली. राज्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी ताज महाला बांधून देऊ एवढेच आश्वासन फक्त त्यांनी दिलेले नाही, असे ते म्हणाले. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आधीच्या राजवटीपेक्षा आमच्या सरकारने खूप चांगले काम केले, असा दावाही त्यांनी केला.