Irshalgad Landslide : रायगड जिल्ह्यामध्ये खालापूरजवळील इर्शाळवाडी मध्ये माळीण घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याची घटना बुधवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली आहे. यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस आणि दुर्गम भाग असल्याने मदतकार्यात अडथळे येत असून एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तात्काळ इर्शाळवाडी येथील दुर्देवी घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही नियंत्रण कक्षातून दुर्घटनास्थळावर उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना बचाव, मदतकार्यासाठी हेलिकॉप्टरसह आदी यंत्रणा तात्काळ उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही पूर्ण केली.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. “रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे.”
रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 20, 2023
“प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.