रायपूर – खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची दुःखद घटना समोर आली आहे. तसेच परिसरात अनेक लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेच्या ठिकाणी एनडीआरएफ पथके बचाव कार्य करत आहे. गावात जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे बचाव कार्य करण्यात अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. सध्या या दुर्घटनास्थळी पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे बचावकार्यत अडथळे येत आहेत. पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी यांच्यासह सर्वच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली.
या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज सकाळी या रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार आहे. रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील अजून जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे यासाठी डॉक्टरांशी चर्चा केली.
यावेळी एमजीएम चे डॉ. सागर, पनवेल महापालिकेचे डॉ. गोसावी नायब तहसीलदार पनवेल श्री. लाचके उपस्थित होते. या दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबांना शासन पाच लाखांची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. इथे सुरू असलेल्या बचाव कार्यावर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेतला. प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. दोन हेलिकॉप्टरसह सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी सज्ज आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.