वर्धा- गेल्या काही दिवसांपासून बोगस बियाण्यांचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. आता या प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आली आहे. याप्रकरणी सुरु असलेल्या तपासात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. तपास करणाऱ्या स्पेशल टीममध्ये एकूण 15 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे हे या ‘एसआयटी’ टीमचे प्रमुख असणार आहेत. याशिवाय चार पोलीस उप निरीक्षक आणि दहा पोलीस कर्मचाऱ्यांचा यात समावेश असणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी एसआयटी स्थापन केली आहे.
या प्रकरणी आत्तापर्यंत मुख्य सुत्रधारासह 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशाची बॉर्डर असे परराज्याचे कनेक्शन या प्रकरणाशी जुडले असल्याची सूत्रांची माहिती आहे. विविध 14 नामांकित कापूस बियाणे कंपनीचे बनावट पॅकेट तयार करण्यात आले होते.
1 लाख 18 हजार 13 बनावट पॅकेट पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने वर्धा जिल्ह्याच्या हमदापुर येथून एका पशुवैद्यकीय डॉक्टरलाही अटक केली आहे. विजय अरुण बोरकर असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे.