चेन्नई -तामीळ चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असणारा विजय राजकारणात प्रवेश करेल, असे तर्क-वितर्क सुरू आहेत. अशात त्याने विद्यार्थ्यांना केलेल्या एका अनोख्या आवाहनामुळे त्याच्या संभाव्य राजकारण एन्ट्रीच्या चर्चांना आणखीच उधाण आले आहे. तामीळनाडूतील इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षांतील टॉपर्सचा सत्कार एका सोहळ्यात करण्यात आला.
त्यावेळी बोलताना विजयने उपस्थितांच्या टाळ्या मिळवणारे भाषण केले. विद्यार्थ्यांनो, निवडणुकांवेळी पैसे न स्वीकारता मतदान करण्याची विनंती पालकांना करा. प्रयत्न करा. तुम्हाला कदाचित यश मिळेल आणि बदल पहा. लवकरच नवमतदार बनणाऱ्या विद्यार्थ्यांनी पैसे न स्वीकारता लोकप्रतिनिधी निवडून देण्यामागील फायदे ध्यानात घ्यायला हवेत.
ते घडेल तेव्हा विद्यार्थ्यांनी घेतलेले शिक्षण परिपूर्ण ठरेल. समजा, एखादा राजकारणी मतदारसघांतील 1.5 लाख मतदारांना प्रत्येकी 1 हजार रूपये देतो. म्हणजेच, मतांसाठी तो 15 कोटी रूपयांची लाच देतो. तेवढी लाच देणाऱ्याने आधी किती कमावले असतील याचा विचार करा. या सर्व बाबी तुमच्या शैक्षणिक व्यवस्थेच्या भाग बनायला हव्यात, अशी इच्छा विजयने विद्यार्थ्यांपुढे बोलताना व्यक्त केली.