लंडन – भारतीय संघ आज (गुरुवार) यजमान इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा त्यांना या सामन्यासह मालिकाही जिंकण्याची संधी आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 10 गडी राखून जिंकत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
जोस बटलरच्या नेतृत्वाखालील यजमान इंग्लंडचा संघ टी-20 मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिकेतही अपयशी ठरत आहे. त्यांना पहिल्या सामन्यात भारताच्या वोगवान गोलंदाजांचा सामनाच करता आला नाही. त्यांचे नावाजलेले फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने त्यांना कशाबशा 110 धावा करता आल्या व हे आव्हान भारताने एकही गडी न गमावता पूर्ण करत 10 गडी राखून सामना जिंकला.
भारत विरुद्ध इंग्लंड
वेळ – संध्याकाळी 5-30 पासून
ठिकाण – लॉर्डस, लंडन
थेट प्रक्षेपण – सोनी स्पोर्टस नेटवर्क
आता दुसरा सामना क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर होत असून या मैदानावरचा भारतीय संघाचा इतिहास चांगला आहे. उलट यजमान इंग्लंड संघाला मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये या मैदानावर फारसे यश मिळालेले नाही. त्यातच त्यांचे कर्णधार बटलरसह जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, ज्यो रूट असे दीग्गज फलंदाज अपयशी ठरत आहेत. टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावत मालिकाही गमावलेल्या इंग्लंडने अखेरच्या सामन्यात विजय मिळवला, पण तरीही त्यांना भारतीय क्षेत्ररक्षकांनी काही झेल सोडून मदतच केली होती. आता त्यांच्या संघातील नवोदित गोलंदाजांनाही सूर गवसलेला नाही हेच पहिल्या एकदिवसीय सामन्यात दिसून आले.
दुसरीकडे भारताची फलंदाज जास्त भक्कम बनली आहे. कर्णधार रोहित शर्माने पहिल्या सामन्यात नाबाद 76 धावांची आक्रमक खेळी करत आपण भरात येत असल्याचा इशाराच दिला आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व नेतृत्व या चारही विभागात भारताने इंग्लंडपेक्षा जास्त भरीव कामगिरी केली असल्याने याही सामन्यात भारताचेच पारडे जड राहणार आहे.
गोलंदाजीबाबत बोलायचे तर प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, महंमद शमी यांनी इंग्लंडच्या फलंदाजीची पहिल्या सामन्यात वाताहत केली होती, तशाच कामगिरीची याही सामन्यात कर्णधार रोहितला अपेक्षा असेल. विजेत्या संघात काही बदल होण्याची शक्यता नसली तरीही आगामी मालिकांचे व्यस्त वेळापत्रक पाहता प्रसिद्ध कृष्णा व श्रेयस अय्यर यांच्या जागी अन्य खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोहलीबाबत अस्पष्टता कायम
स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे विराट कोहली पहिल्या सामन्याला मुकला होता. मात्र, आता उर्वरित दोन सामन्यांत तो खेळू शकेल का, याबाबत अद्याप बीसीसीआयने काहीही सांगितलेले नाही. त्याचा वैद्यकीय अहवाल आल्यावरच याबाबत माहिती दिली जाणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.
अर्शदीपला संधी मिळण्याचीही शक्यता
आयपीएल स्पर्धेत आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांनाच चकीत करून सोडणाऱ्या नवोदित अर्शदीप सिंगला या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंडमध्ये लहरी हवामानात या मैदानावर स्विंग मिळतो हे लक्षात घेता प्रसिद्ध कृष्णापेक्षा दोन्ही स्विंग करू शकत असलेला अर्शदीप जास्त प्रभावी ठरेल. आता अंतिम संघ निवड करताना रोहित कोणत्या खेळाडूंना निवडतो याकडे लक्ष राहणार आहे.