मुंबई – “माझी माती, माझा देश’ अभियान हे देशासाठी शहीद होणाऱ्या वीरांच्या त्यागाला, बलिदानाला नमन करण्याची संधी देणारा कार्यक्रम आहे. या अभियानातून नव्या पिढीला राष्ट्रप्रेमाची नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मुंबई महापालिका यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त “माझी माती, माझा देश’अभियान राबविण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत शुक्रवारी (27 ऑक्टोबर) ऑगस्ट क्रांती मैदान येथे अमृत कलश यात्रा राज्यस्तरीय सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, सर्वसामान्य माणूस केंद्र बिंदू मानून केंद्र आणि राज्य शासन काम करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा यामागे आहे. केवळ पायाभूत सुविधा, इमारती, मोठे प्रकल्प, भौतिक सुविधाच महत्वाच्या नाहीत, तर त्याचबरोबर आपल्या मातृभूमीविषयी प्रेम, संस्कृतीविषयी आदर तितकाच महत्वाचा आहे.
त्यामुळेच “मेरी माटी, मेरा देश’ अर्थात “माझी माती, माझा देश’ अभियान हे देशासाठी शहीद होणाऱ्या वीरांच्या त्यागाला, बलिदानाला नमन करण्याची संधी देणारा कार्यक्रम आहे. या अभियानातून नव्या पिढीला राष्ट्रप्रेमाची नवी ऊर्जा मिळेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.