नवी दिल्ली – मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगढमधील मुख्यमंत्री निवडीवरून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासमोर पेच निर्माण झाला आहे. ती कोंडी फोडण्यासाठी उद्या (शुक्रवार) पक्षाकडून केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपने संबंधित तीन राज्यांत घवघवीत यश मिळवले. मात्र, निकाल जाहीर होऊन चार दिवस उलटले तरी पक्षाने मुख्यमंत्री निश्चित केलेले नाहीत.
आता केंद्रीय निरीक्षकांच्या नियुक्तीच्या माध्यमातून त्या प्रक्रियेला गती दिली जाण्याची चिन्हे आहेत. संबंधित निरीक्षक तिन्ही राज्यांचे दौरे करून नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकांना उपस्थित राहतील. त्या बैठकांमध्ये मुख्यमंत्र्यांची नावे निश्चित होतील. चालू आठवड्याच्या अखेरीस तिन्ही राज्यांचे मुख्यमंत्री ठरतील, अशी माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली.
मुख्यमंत्रिपदांचे उमेदवार जाहीर करण्याचे टाळून भाजप निवडणुकांना सामोरा गेला. त्यातून त्या पक्षाने मुख्यमंत्रिपदांची शर्यत खुली ठेवली. त्यामुळे दावेदार वाढल्याचे मानले जाते. आता मुख्यमंत्रिपदांच्या शर्यतीत असलेल्या दावेदारांनी केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठींसाठी दिल्ली दौरे सुरू केले आहेत. त्यातून लॉबिंग सुरू झाल्याचे मानले जात आहे.
दावेदार अधिक असल्याने कुणाला न दुखावता निवड करण्याचे आव्हान भाजपच्या नेतृत्वापुढे उभे राहिले आहे. लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्या निवडणुकीला सामोरे जाताना कुणी नाराज होणार नाही याची दक्षता नेतृत्वाला घ्यावी लागत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री निवडताना घाईघाईने निर्णय घेण्याचे टाळून भाजप सावध पाऊले उचलत असल्याचे दिसते. मुख्यमंत्री निवडताना तो पक्ष जुन्या-जाणत्यांना पुन्हा संधी देणार की प्रयोग करणार याविषयी उत्सुकता आहे.