अशोक गायकवाड यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सातारा – धोम धरणालगत व्याहळी, ता. वाई येथील जोगळेकरवाडीच्या क्षेत्रात उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर व धोकादायक बंगल्यांची बांधकामे हटवा, अशी मागणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई न केल्यास येत्या काळात धरणाला धोका वाढणार आहे. परिणामी वाई शहर धोक्यात येऊ शकते, असेही या निवेदनात नमूद आहे.
पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीत धोम धरणातील पाण्याची पातळी वाढली होती. परिणामी बेकायदेशीर बांधकामांच्या भिंतीवरून पाणी आतमध्ये आले होते. यावरून बंगल्यांची बांधकामे धरणाच्या पाणी पातळी रेषेमध्ये करण्यात आल्याचे स्पष्ट होते. त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. पुणे व वाई तालुक्यातील धनदांडग्या लोकांनी कायदे धाब्यावर बसवून बंगल्यांची कामे सुरू केली आहेत. पैशाच्या जोरावर ते कोणत्याच शासकीय यंत्रणेला जुमानत नाहीत.
बांधकामांना परवानगी देताना अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक करण्यात आले आहे. मात्र, बांधकाम क्षेत्रात धरणाचे पाणी आत येऊ नये यासाठी आवश्यक लांबी व रुंदीची भिंत बांधण्याचे कलम असताना त्याचेही उल्लंघन करण्यात आले आहे. या इमारतींमधील सांडपाणी धरणामध्ये सोडण्यात येत आहे.
वास्तविक मिळकतीचा बिगरशेती परवाना रद्द करण्याची मागणी धोम पाटबंधारे विभागाने केली आहे. त्याचीही दखल जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेली नाही. वाई, खंडाळा, फलटण तालुक्यांसाठी धोम धरण हे वरदान आहे. सद्यस्थितीत धरणाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात नाही. भविष्यात बेकायदेशीर बंगल्यांच्या भिंतीवरून उडी मारून एखादी देशविघातक व्यक्ती धरणाला धोका पोहोचवू शकते. त्यामुळे या भागातील व देशाचा नागरिक म्हणून असलेली जबाबदारी लक्षात घेता, येत्या काळात बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण अथवा आत्मदहन करावे लागेल. अशी वेळ आली अन् माझ्या जीविताला धोका निर्माण झाला तर त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.
महाबळेश्वर तालुक्यातही कारवाईची गरज
धोम धरणासह महाबळेश्वर तालुक्यातदेखील मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व धोकादायक बांधकामे करण्यात आली आहेत. तेथे भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती टाळण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील बेकायदेशीर व धोकादायक बांधकांमाचे सर्वेक्षण करून प्रशासनाने कारवाई करावी, या मागणीचे स्मरणपत्र गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.