कोरेगाव, (प्रतिनिधी)- प्रकल्पीय तरतुदींचे उल्लंघन करून धोम धरणातून बलकवडी कालव्याद्वारे फलटण आणि खंडाळा तालुक्याला पाणी सोडल्याच्या निषेधार्थ धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी दि. २९ एप्रिल रोजी कोरेगाव येथील तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. त्यामध्ये कार्यक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती समितीचे अध्यक्ष सी. आर. बर्गे यांनी दिली.
समितीच्यावतीने महसूल नायब तहसीलदार उदयसिंग कदम यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नसल्याने अखेरीस लोकसभा निवडणुकीसाठी डी. पी. भोसले कॉलेज येथे तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षामध्ये प्रांताधिकारी अभिजित नाईक यांना निवेदन सादर करण्यात आले.
सातारा सिंचन मंडळाला संघर्ष समितीच्यावतीने वेळोवेळी निवेदने देऊनही आणि सातत्याने वस्तुस्थिती निदर्शनास आणून देऊन देखील धोम धरणातून बलकवडी कालव्यातून खंडाळा आणि फलटण तालुक्याकडे पिण्यासाठीचे पाणी नावाखाली पाणी सोडण्यात आले आहे. वास्तविक ज्या परिसरातून पिण्यासाठी पाण्याची मागणी केली जात आहे,
त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती असून पिण्याचे पाणी या नावाखाली शेतीसाठी पाणी नेण्यासाठी हा प्रयत्न आहे, असा स्पष्ट आरोप करण्यात आला. केवळ राजकीय आकसाने, धोम धरण लाभक्षेत्रातील शेतकर्यांचे हक्काचे पाणी बलकवडी कालव्यातून सोडण्यात आले आहे.
धोम बालकवडी धरणातील त्या परिसरासाठी राखीव असलेल्या पाण्यापेक्षाही जास्त पाणी यापूर्वीच त्यांना देण्यात आलेले असताना नियमबाह्यरित्या, प्रकल्पीय तरतुदींचा भंग करून सोडलेले पाणी रविवार दि. २८ एप्रिलपर्यंत बंद न केल्यास बलकवडी कालव्यातून पाणी सोडल्याच्या निषेधार्थ लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.