आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : ग्रामपंचायतींच्या कामांचा खोळंबा
राजगुरूनगर – ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून खेड तालुक्यातील ग्रामसेवकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले चौथ्या टप्प्यातील काम बंद आंदोलन गेली सहा दिवसांपासून सुरू असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर या आंदोलनामुळे ग्रामपंचायतीच्या विविध कामांचा खोळंबा झाल्याने अनेक कामे ठप्प होऊन कामांमध्ये अडथळे वाढले आहेत.
ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीमध्ये लागणारे महत्त्वाचे शिक्के व कपाटांच्या चाव्या जमा करून त्या सर्व खेड पंचायत समितीचे कक्ष अधीक्षक व कक्ष अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केल्या आहेत. सर्वांनी गुरुवार (दि. 22) पासून खेड पंचायत समितीच्या कार्यालयासमोर असहकार आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी (दि. 27) त्यांच्या आंदोलनाचा सहावा दिवस असेल, त्यांच्या आंदोलनाकडे अद्याप कोणताही राजकीय पुढारी अथवा शासकीय अधिकारी फिरकला नसल्याने ग्रामसेवकांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामसेवकांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्या पूर्ण केल्या जात नसल्याने खेड तालुक्यातील ग्रामसेवक त्रस्त झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भागातील ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे.
शासन लेखी आदेश देत नाही, आमच्या मागण्या मान्य करत नाहीत, तोपर्यंत काम बंद सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गोसावी, खेड तालुकाध्यक्ष सुरेश घनवट व सचिव देविदास आतार यांनी दिला आहे. या आंदोलनात उपाध्यक्ष बाळासाहेब मतकर, कोषाध्यक्ष बाबाजी चव्हाण, रामा शिंदे, उत्तम कांबळे, निलेश पांडे, सुप्रिया सांडभोर, मोनिका गुंजाळ, मारुती देव्हाडे, छाया इरनक, अलका राणे आदींसह खेड तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामसेविकांनी सहभाग घेतला आहे.
ग्रामसेवकांचे नेमके चाललेय काय?
खेड तालुक्यातील ग्रामसेवकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून खेड पंचायत समितीच्या कार्यालयासमोर असहकार आंदोलन सुरु ठेवले आहे. टाळ – मृदंगाचा गजर करत आणि भजनात तल्लीन होऊन सुरु असलेल्या या आंदोलनामुळे ग्रामसेवकांचे नेमके चाललेय काय? अशी चर्चा या भागात सुरु आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.