नवी दिल्ली – तीन राज्यांतील निकालात भाजपने आघाडी घेतल्यानंतर दिल्लीतून पहिल्यांदा प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की, लोकांनी “मोदींच्या हमी” वर विश्वास व्यक्त केला आहे.
राजस्थानचे भाजपचे निवडणूक प्रभारी असलेले जोशी यांनी काँग्रेस आणि त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांवरही टीका केली. तीन राज्यात लोकांनी भाजपला आशीर्वाद दिला आहे, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे आणि काँग्रेसची खोटी आश्वासने नाकारली आहेत,असे जोशी म्हणाले.
हिंदी हर्ट लँड समजल्या जाणाऱ्या तीन राज्यांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. मध्यप्रदेश आणि राजस्थानात भाजप पहिल्यापासूनच आघाडीवर होता, परंतु छत्तीसगड मध्ये मात्र सुरूवातीच्या टप्प्यात भाजप पिछाडीवर होता. त्यामुळे भाजप नेत्यांनी सुरूवातीला निकाल संपुर्णपणे हाती येईपर्यंत वाट पाहिली. त्यानंतर छत्तीसगड मध्येही भाजपने आघाडी घेतल्यानंतर दिल्लीत प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांशी संवाद साधत हा मोदींच्या चेहऱ्याचा विजय असल्याचे नमूद केले.
दरम्यान, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजपने मध्य प्रदेशात 150 चा आकडा पार केला आहे आणि राजस्थानमध्येही बहुमताचा टप्पा ओलांडला आहे.
छत्तीसगडमध्येही भाजपचा विजय होताना दिसत आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रेस प्रचंड बहुमताने विजयी होताना दिसत आहे.