नवी दिल्ली – मोदी की गॅरंटी म्हणून आज पंतप्रधानांकडून ज्याज्या घोषणा केल्या जात आहेत त्याला कसलीही वॉरंटी नाही अशी खिल्ली तृणमुल कॉंग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी उडवली आहे. त्यांनी भाजप नेत्यांना “बाहेरचे आणि बंगालविरोधी” म्हणून लेबल लावले आहे. हे नेते केवळ निवडणुकीच्या वेळी राज्याला भेट देतात आणि नंतर कोणतीही जबाबदारी न पाळता निघून जातात असेही त्यांनी म्हटले आहे.
ब्रिगेड परेड मैदानावर ‘जनगर्जन सभा’ रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. बंगालचा निधी रोखून येथील जनतेची कुचंबणा करणाऱ्या भाजपला या लोकसभा निवडणूकीत येथील जनता चोख उत्तर देईल असेही त्यांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जी आणि टीएमसी आश्वासने पाळतात. भाजप आणि त्यांचे नेते बंगालविरोधी आहेत, ते बाहेरचे आहेत. निवडणूका झाल्यावर ते पळून जातात असे ते म्हणाले. तृणमूल काँग्रेसने रविवारी या भव्य रॅलीतून लोकसभा निवडणुकीची मोहीम सुरू केली.