रायगड – ज्या विरोधकांवर हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले त्याच विरोधकांना भाजपकडून निमंत्रण मिळत आहे. मंत्री, उपमुख्यमंत्री आणि थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली जात आहे. तुम्ही आमच्याकडे आल्यावर तुम्हाला मंत्रिपद मिळणारच आणि हीच मोदींची गॅरंटी आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा सध्या कुटुंब संवाद दौरा चालू आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी रायगड येथील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या प्रचाराला मीच आलो होतो. यांना (नरेंद्र मोदी) पंतप्रधान करा असे सांगितले होते. आताही मीच आलोय. कारण आता आपल्याला हुकुमशाही नको. गेल्या आठवड्यात २६ जानेवारी रोजी देशाने प्रजासत्ताक दिन साजरा केला.
तेव्हा आपण म्हणालो प्रजासत्ताक दिन चिरायू होवो. आता परत एकदा तीच प्रार्थना करावी लागेल. कारण, पुढच्या वर्षीचा प्रजासत्ताक दिन होणारच नाही असे वाटते. या लोकांनी देशाची राज्यघटना पायदळी तुडवली आहे. भरदिवसा राज्यघटना आणि लोकशाहीचा मुडदा पाडत आहे. प्रत्येकावर दबाव आणला जात आहे. जे जे विरोधी पक्षात आहेत, विरोध करतात त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भाजप व शिंदे गटाला उद्देशून ते म्हणाले, अरे तुम्ही माझा पक्ष चोरला, मग आता माझ्या लोकांच्या मागे का लागला आहात? तुम्ही आगामी निवडणुकीत ४०० पार होणार आहात ना? मग व्हा ना ४०० पार, आता तर आम्ही बघतोच, तुम्ही ४०० पार कसे होता. माझ्या साध्या साध्या लोकांना पोलिसांतले जुने खटले काढून त्रास दिला जात आहे. जुनी प्रकरणं उकरून आयकर विभागाच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. परंतु, तुमच्याकडे जे टोणगे आलेत, जे बाजारबुणगे आलेत त्यांच्यावरील खटल्यांचे काय झाले?
तसेच तुमच्याकडे आलेल्या भ्रष्ट नेत्यांचे भांडाफोड आम्हाला जनतेसमोर करावे लागेल. तिकडे झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अटक केली, नितीश कुमार तुमच्याकडे आल्यावर त्यांच्या सर्व केसेस माफ केल्या. नितीश कुमार यांच्या आप्तस्वकीयांवर धाडी पडल्या होत्या, त्याचे पुढे काय होणार आहे. लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना समन्स पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्रात रोहित पवार यांची चौकशी चालू आहे. किशोरी पेडणेकर, रवींद्र वायकरांच्या चौकशा चालू आहेत. परंतु, मी या भाजपाला एवढंच सांगेन, तुम्ही कितीही कारवाया करा, आम्ही झुकणार नाही, अशा शब्दांत ठाकरे यांनी ताशेरे ओढले.