रायपूर – छत्तीसगडमध्ये भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणूक लढवली. आता बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या भाजपाचा मुख्यमंत्री कोण असेल, याची चर्चा आकाराला येत आहे.
भाजपने ही निवडणूक मोदी आणि पक्षाच्या व्हिजनवर लढवली. सलग तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि संपूर्ण राज्याला परिचित असलेले रमणसिंग पुन्हा एकदा भाजपच्या पसंतीस उतरणार की केंद्रिय नेतृत्त्वाच्या जवळ असलेल्या अन्य कोणाला संधी मिळणार, या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल. शिवाय भाजपा प्रदेशाध्यक्ष अरुण साओ हेही या पदाचे दावेदार मानले जात आहेत.
महाराष्ट्र आणि हरियाणा मॉडेलप्रमाणेच भाजपही असे एखादे नाव पुढे आणू शकते, ज्याची दूरवर कुठेही चर्चा झाली नाही.
केंद्रीय नेतृत्वाचे प्रिय विजय बघेल यांची दावेवारी प्रबळ आहे. विजय बघेल हे ओबीसीच्या कुर्मी समाजातून आले आहेत. कॉंग्रेसचे नेते आणि आता माजी झालेले भूपेश बघेलही याच समाजाचे आहेत. विजय बघेल यांची एक स्वच्छ प्रतिमा आहे. त्यांना राज्यातील स्थानिक नेत्यांचा विरोध नाही. ते हायकमांडचा विश्वासू मानले जातात.
रमणसिंगही प्रबळच…
तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले रमणसिंग यांना पक्षाने मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले नसले तरी त्यांचे योगदान पूर्णपणे नाकारता येणार नाही. सुरुवातीला रमणसिंग यांची भाजपमध्ये नक्कीच उपेक्षा झाली होती. पण तिकिट वाटपावेळी हायकमांडनेही रमणसिंग यांचे ऐकले. रमणसिंग यांनी तीन टर्म सरकार चालवले आहे आणि राज्य चालवण्याची त्यांना चांगली जाण आहे हे केंद्रीय नेतृत्वाला माहीत आहे. ते राज्यात लोकप्रिय आहेत.
प्रदेशाध्यक्ष अरुण साओंचे काय?
राज्यात भाजपाची सत्ता नसताना विजय खेचून आणण्यात प्रदेशाध्यक्ष अरुण साओ यांचे योगदान विसरता येणार नाही. त्यामुळे तेही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होऊ शकतात. अरुण साओ हे ओबीसी समाजातील आहेत. अवघ्या सहा महिन्यांनीच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे इथेही भाजपला स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री हवा आहे जो हायकमांडच्या सूचनांची पूर्ण अंमलबजावणी करेल. अरुण साओ त्यासाठी योग्य उमेदवार आहेत.